मैत्रिणींनो, सध्याच्या काळात ताणतणाव, धावपळ
प्रचंड वाढली आहे. या कारणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक थकवा येऊ लागला आहे. मुळात
आता संवाद संपत चालला आहे. आपली आयुष्य ब्लॉकच्या चार
भिंतींमध्ये कैद होऊ लागली आहेत. आपण आणि आपलं कुटुंब याभोवती आयुष्य
फिरू लागलं आहे. आपल्या आयुष्यात स्मार्टफोनची घुसखोरी झाली आहे. यामुळे वाचन, गप्पा सगळं काही मागे पडताना दिसतंय. आता पूर्वीसारखा शेजार राहिलेला नाही.
सध्याच्या फ्लॅटसंस्कृतीत शेजारी कोण राहतंय हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे शेजारधर्म
पाळणं वगैरे प्रकार
शहरांमध्ये तरी संपत चालले आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्य अगदी सरधोपट होतं. संध्याकाळच्या वेळी घरांमधून शुभंकरोती, रामरक्षेचे स्वर निनादायचे. घरातल्या बायकांचा हसण्या-खिदळण्याचा आवाज यायचा. किमान रात्रीची जेवणं एकत्र व्हायची. दिवसभरातल्या घडामोडींची माहिती दिली जायची. यामुळे घरच्यांशी बोलल्यावर ताण हलका व्हायचा. घरच्या अन्नावर भर असायचा जोर-बैठका काढल्या जायच्या. घरच्या गच्चीवर किंवा अंगणात सूर्यनमस्कार घातले जायचे. मुलं मैदानी खेळ खेळायचे. उपकरणं कमी असल्यामुळे कामं करता करता बायकांचा व्यायाम व्हायचा. आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. ऐन तारुण्यात हृदयविकार जडू लागला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टरॉल हे परवलीचे शब्द बनून गेले आहेत. आता डाएट करावं लागतंय. मुळात आयुष्यातली शांतताच हरवून गेली आहे. आयुष्य घराचे हप्ते फेडण्यात सरू लागलं आहे. गेल्या काही वर्षांमधल्या सुबत्तेने शांततेला दूर सारलं आहे. सुख, समाधान या गोष्टी पेशांवर तोलल्या जात आहेत. म्हणूनच आपण वेळेआधीच थकत चाललो आहे. हा थकवा दूर करायचा असेल तर धावपळ काही प्रमाणात तरी कमी करायला हवी. हरवलेला संवाद पुन्हा सुरू करायला हवा. पुन्हा एकदा मैदानांवर गर्दी करायला हवी. घरात आल्यावर स्मार्टफोन बाजूला ठेवायला हवा. एखादा दिवस गप्पांसाठी राखून ठेवायला हवा. सुखाची व्याख्या थोडी फार बदलायला हवी. समस्त मैत्रिणींनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.