साधारणपणे दशकभरापूर्वी भारतीय क्रिकेट संघाकडे दर्जेदार, भेदक गोलंदाजी करु शकणारे धडाकेबाज डावखुरे पेसर्स असायचे. झहीर खान, आशिष नेहरा आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना इरफान पठाणसारखा अव्वल डावखुरा देखील संघात उपलब्ध होता. अर्थात, झहीर-नेहराचे ते सुवर्णयुग संपले आणि भारताला सातत्याने या आघाडीवर त्यांची गैरहजेरी जाणवत राहिली. या पार्श्वभूमीवर, झहीर-नेहरा सुवर्णयुगानंतर संघाने आणखी किती डावखुरे गोलंदाज आजमावून पाहिले, त्यांची कामगिरी कशी राहिली आणि भविष्यात त्यांच्याकडून कितपत अपेक्षा आहेत, याचा हा लेखाजोखा!
संधी मिळायलाच हवी, असा अरझान नागवासवल्ला!
भारतीय संघातर्फे भविष्यात सातत्याने संधी मिळायलाच हवी, अशा तीन गोलंदाजांमध्ये पहिला गोलंदाज म्हणजे अरझान नागवासवल्ला. अलीकडेच इंग्लंड दौऱयावर गेलेल्या भारतीय संघात या गुजरातच्या स्पीडस्टारचा राखीव खेळाडूत समावेश होता. नोव्हेंबरमध्ये त्याला दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध लढतीतही खेळवले गेले.
2018 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट पदार्पण करणाऱया या युवा गोलंदाजाने 16 सामन्यात 62 बळी घेतले. अरझानची टी-20 क्रिकेटमधील कामगिरीही उत्तम आहे. सध्या तो 24 वर्षांचा आहे आणि विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये लक्षवेधी योगदान देण्यासाठी तो आश्वासक आहे.
पॉवर प्ले, डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अर्शदीप सिंग
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने अर्शदीप कमनशिबी ठरला. आयपीएल 2021 मध्ये हर्षल पटेल व अवेश खान यांच्या साथीने अर्शदीपने देखील सर्वोत्तम गोलंदाजी साकारली. पंजाबच्या या अव्वल गोलंदाजाने 12 सामन्यात 19 ची सरासरी व 8.27 च्या इकॉनॉमीने 18 बळी घेतले. अर्शदीप प्रारंभी पॉवर प्लेमध्ये आणि नंतर डेथ ओव्हर्समध्ये देखील अव्वल मारा साकारु शकतो. दडपणाखालीही संयम राखण्यात तो यशस्वी झाला असून हे त्याचे बलस्थान ठरु शकते.
संधी मिळूनही प्रवाहाबाहेर फेकला गेलेला जयदेव उनादकट
अगदी झहीर खान व आशिष नेहरा खेळत होते, त्या कालावधीपासूनच भारतीय व्यवस्थापनाने जयदेव उनादकटला आजमावून पाहिले आहे. तो जलद गोलंदाजीचे भविष्य म्हणूनही पाहिला जात असे. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचे त्याला सोने करता आले नाही. अलीकडील कालावधीत तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करत असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला आणखी संधी मिळण्याची शक्यता विरळ असेल.
मुख्य प्रवाहात परतू शकणारा के. खलील अहमद
यू-19 क्रिकेटमध्ये जोरदार वरचष्मा गाजवल्यानंतर खलील अहमदला भारतीय संघात स्थान लाभले. त्याला अनेकदा अंतिम एकादशमधूनही संधी मिळत राहिली. पण, यानंतरही तो याचा पुरेपूर लाभ घेऊ शकला नाही. राजस्थानचा हा युवा डावखुरा गोलंदाज सध्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे. खलीलमध्ये बरीच गुणवत्ता असून तो तरुण देखील आहे. अचूकता व अन्य काही घटकांवर अधिक मेहनत घेतली तर तो निश्चितपणाने मुख्य प्रवाहात परतू शकतो.
बरिंदर सरणचा आता केवळ नशिबावर हवाला!
2016 मध्ये बरिंदर सरणने भारतीय संघातर्फे पदार्पण केले. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये लक्षवेधी योगदान दिले आणि तोच कित्ता आयपीएल 2016 मध्येही गिरवला. अर्थात, नंतर तो आपला दर्जा कायम राखू शकला नाही आणि सध्या त्याच्याकडे आयपीएलचा करारही कायम राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
दुखापतीशी झुंजत असणारा टी. नटराजन
आयपीएल 2020 मधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये टी. नटराजनचा आवर्जून समावेश होतो. याच बळावर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाण्याची संधी मिळाली आणि त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले. मात्र, दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीला सातत्याने ब्रेक लागत राहिले. सध्या तो भारतीय संघात परतण्यासाठी झगडत आहे.
एका सामन्यानंतर बाहेर फेकला गेलेला श्रीनाथ अरविंद
आयपीएलमध्ये आरसीबीतर्फे अव्वल गोलंदाजी साकारल्यानंतर श्रीनाथ अरविंदला भारतीय संघातर्फे एका सामन्यात खेळण्याची संधी जरुर मिळाली. पण, आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो संघात एकदाही परतू शकला नाही. सध्या तो कर्नाटकतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाची धुरा सांभाळत आहे.
वैविध्यपूर्ण मारा करु शकणारा चेतन साकरिया
2021 मध्ये आपले आयपीएल पदार्पण करणाऱया चेतन साकरियाने पदार्पणातच 30.42 ची सरासरी व 8.19 च्या इकॉनॉमीने 14 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. राजस्थान रॉयल्सतर्फे पहिला टप्पा गाजवल्यानंतर त्याने लंकेविरुद्ध भारतीय संघातर्फे पदार्पणही केले.
साकरिया हा टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा खेळाडू ठरण्याची क्षमता राखून आहे. सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत भेदक मारा साकारत असताना त्याने गोलंदाजीतील वैविध्याची प्रचिती दिली. येत्या काही महिन्यात त्याला आणखी संधी मिळू शकते. झहीर-नेहरा युगापासून मात्र तरी भारत अद्याप बराच दूर असणार आहे.