31 वॉर्डच्या उमेदवारांनी दिले जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्वसामान्य जनतेची आणि उमेदवारांची दिशाभूल करणाऱया आहेत. लोकशाहीऐवजी दडपशाही करत ही निवडणूक पार पडली. महत्त्वाचे म्हणजे व्हीव्हीपॅट न लावता ही निवडणूक झाली. अत्यंत गोंधळाच्या वातावरणात निवडणूक पार पडली असून फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 31 वॉर्डच्या उमेदवार राजश्री हावळ, आपच्या राखी हेगडे आणि कॉंग्रेसच्या वनिता गोंधळी यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
महापालिका निवडणुका अत्यंत घाईगडबडीत घेण्यात आल्या. मतदारयाद्या योग्यप्रकारे देण्यात आल्या नाहीत. याचबरोबर ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडले गेले नाही. त्यामुळे या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाला आहे. तेव्हा निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षांचे उमेदवार उपस्थित होते.