सध्या युरेनियम या धातूचे महत्त्व मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कोळसा जाळून, पर्यावरणाची हानी करून वीजनिर्मिती करण्यापेक्षा युरेनियमच्या साहाय्याने अणुवीज निर्माण करणे हा पर्यावरण संरक्षणाचा उत्तम मार्ग असल्याचे मत अनेक देशांच्या सरकारांचे झाले आहे. भारतही याला अपवाद नाही. दुर्दैवाने भारतात अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिका खंडातील काही देश यांच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात युरेनियम सापडते. त्यामुळे आपल्याला वीजनिर्मितीसाठी युरेनियमच्या आयातीवर अवलंबून रहावे लागते. राजस्थानात तसेच उत्तर प्रदेश व अन्य काही उत्तरेकडील राज्यांमध्ये युरेनियमचे मोठे साठे आहेत, असे 50 वर्षांपूर्वीपासून सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकदा या साठय़ांचा शोध घेण्यासाठी मोहिमा आखण्यात आल्या आहेत. तथापि, आतापर्यंत फारसे यश मिळालेले नाही.
पण आता पुन्हा एकदा संशोधक आणि सरकारे यांच्या आशा पल्लवित झालेल्या दिसून येतात. भूमीअंतर्गत युरेनियमचे साठे शोधण्याकरिता हेलिबोर्न सर्वेक्षण अर्थात विशेष प्रकारच्या हेलिकॉप्टरमधून सर्वेक्षण केले जाते. गेले पंधरा दिवस असे सर्वेक्षण पुन्हा एकदा केले जात आहे. हे सर्वेक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान असून आतापर्यंत त्याचा उपयोग झाला नव्हता. या सर्वेक्षणातून संशोधकांच्या म्हणण्यानुसार सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. नारनौल भागात असणाऱया ‘ढोसी के पहाड’ परिसरात युरेनियम सापडण्याची शक्मयता या सर्वेक्षणातून दिसून आली आहे. ‘ढोसी टेकडी’ भागात मोठय़ा प्रमाणावर युरेनियम असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वेक्षणाची सर्व माहिती व विदा (डाटा) हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत संकलित केला जात आहे. तसेच तेथेच त्याचे विश्लेषणही होत आहे. भारताची आवश्यकता भागविण्याइतके युरेनियम या भागात मिळाल्यास पर्यावरणस्नेही मार्गाने वीज निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यासाठी संशोधकांची धडपड सुरू आहे.