राज्यातील कोरोना संख्या सध्या घटत आहे असे आकडेवारी सांगत असतानाच दाट वस्तीच्या राज्यात समूह संसर्गाची शक्यता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वर्तवली आहे. मात्र समूह संसर्गाचा अंदाज याआधीही राज्यासह मुंबईसाठी ही वर्तविण्यात आला होता. त्यामुळे याची भीती न बाळगता धाक मात्र जरूर घ्यावा, हे सांगणे अगत्याचे ठरावे.
मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरात काही रुग्णांनी कोणताही प्रवास केलेला नसतानाही त्यांना कोरोना बाधा झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी प्रवास केला नसल्याने बाधित रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क आला नव्हता हे स्पष्ट आहे. तरीसुद्धा काहींना संसर्ग झाल्याचे नोंदविण्यात आले. या संसर्गाला त्यावेळी स्थानिक संसर्ग असे संबोधण्यात आले. हीच समूह संसर्गाची पहिली पायरी असावी. नंतर कोरोना रुग्णसंख्येचा भडकाच अनुभवायास मिळाला. मात्र सध्या ऑक्टोबरच्या मध्यावर येत असताना संसर्गित रुग्णांची संख्या खालावली. याची कारणमीमांसा वेगवेगळे कोरोना निरीक्षक वेगवेगळ्या पद्धतींने करत आहेत. आणि त्याचवेळी समूह संसर्गाची केंद्राची कबुली सध्याच्या संसर्ग स्थितीला विरोधाभासी असली तरीही तितकीच भयचकित करणारी आहे.
गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत कोरोनाला सामोरे जाण्याचे सरकारी यंत्रणांचे तंत्र आणि सवय नसतानाही लोकांनी अवलंबलेले नियम यामुळे या समूह संसर्गाला अडसर ठरत असल्याचे घटत्या रुग्णसंख्येने स्पष्ट होते. पाच अंकात दिसून येणारी रुग्णांची नोंद गेल्या आठवडय़ात थेट चार अंकात होऊ लागली. 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्वात कमी कोरोना नोंद 7 हजार 89 एवढी होती. 13 ऑक्टोबर रोजी मुंबईतील सर्वात कमी कोरोना नोंद 1325 एवढी करण्यात आली. ही नोंद पाहता कोरोना लवकरच आटोपते घेईल असे वाटत आहे. मात्र तज्ञांच्या मते ही रोजची नोंद 500 च्या घरात होऊ लागल्यावर महिनाभराच्या कालावधीनंतर यावर भाष्य करणे उचित ठरेल.
काही राष्ट्रात कोरोना साथ आटोक्यात येताना दिसत असतानाच अचानक दुसरी लाट सुरु झालेली आढळून आली. तोपर्यंत कोरोना विषाणूची लक्षणे बदलताना दिसून आली. फ्रान्समध्ये अशीच कोरोना संख्या घसरत होती. मात्र अचानक रुग्ण वाढ दिसू लागली. ही दुसरी लाट असल्याचे सांगितले गेले. त्यासाठी फ्रान्समध्ये पुन्हा कर्फ्यू जारी करावा लागला.
दरम्यान कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा आग्रह विरोधी पक्षाकडून होत आहे. राज्यातील 92 हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता 75 हजार चाचण्या प्रतिदिन झाले असल्याचा आरोप होत आहे. तर मुंबईत संसर्गाचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढत असूनही चाचण्यांच्या संख्येत घट केली जात आहे. 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाडय़ात 12,70,131 चाचण्या महाराष्ट्रात करण्यात आल्या. याची सरासरी 84,675 चाचण्या प्रतिदिन इतकी येते तर 16 ते 30 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात 13,76,145 चाचण्या करण्यात आल्या. याची सरासरी 91,743 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. नुकतीच 1 ते 15 ऑक्टोबर या काळात केवळ 11,29,446 इतक्या चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी 75,296 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. यामुळे चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. मुंबईतसुद्धा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाही चाचण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. मुंबईत 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाडय़ात संसर्गाचा दर हा 15.95 टक्के इतका होता. तर 16 ते 30 सप्टेंबर या काळात संसर्गाचा दर 17.61 टक्क्यांवर पोहोचला. तसेच 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरवाडय़ात 1,80,848 चाचण्यांमधून पुन्हा 31,453 रुग्ण आढळून आले. संसर्गाचा दर 17.39 टक्के इतका होता. याचाच अर्थ मुंबईतील संसर्गाचा दर सातत्याने वाढतो आहे. तर 1 ते 15 ऑक्टोबर या काळात 672 इतके मृत्यू होते. याचाच अर्थ मृत्यूच्या संख्येतसुद्धा वाढ झाली.
समूह संसर्ग प्रसाराच्या बाबतीत बोलताना या टप्प्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा प्रवाशांच्या संपर्कात न आलेल्या स्थानिक व्यक्तींना संसर्ग होताना दिसतो. प्रसाराच्या या टप्प्यात संसर्गाच्या प्रसाराचे कारण शोधणे आव्हानात्मक असते. तसेच एखाद्या शहरात मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून येतात. हा अनुभव मुंबईत वरळी कोळीवाडा, धारावी, अंधेरी आणि आता बोरिवलीमध्ये येत आहे. बाधित व्यक्ती तिच्या संपर्कातील व्यक्ती, संपर्क व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती अशी प्रसाराची साखळी समूह संसर्गात जोडली जाते. असे असतानाही सध्या मुंबईतील कोरोना दुपटीचा वेग तीन महिन्यांवर आला असल्याचे कोरोना निरीक्षण समितीतील तज्ञ सांगतात. दुसऱया बाजूला संसर्गाचा समूह प्रसार सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गित रुग्णांना लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे संसर्गित व्यक्ती संपर्कात आलेल्या व्यक्तींना नकळत संसर्ग देऊन जाते. ही साखळी अशीच पुढे सुरू राहते. यातून अनेकजण बाधित होत असतात. तरीही देशात काही राज्यात समूह प्रसार सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे. असे असले तरीही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन गर्दी करू नये, सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे आणि स्वच्छता राखणे हेच पर्याय पाळणे तूर्तास अगत्याचे आहे.
राम खांदारे