पुणे / प्रतिनिधी :
पुरंदर विधानसभेची निवडणूक व्यक्तीविरोधी होती. त्यानंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे पुरंदरमध्ये सध्या शिवतारे वजा महाविकास आघाडीचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे, असा टोला पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना लगावला.
काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची बैठक काँग्रेस भवन येथे जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वैर महाविकास आघाडी झाल्यानंतरही संपुष्टात आलेले नाही, याची प्रचिती आली.
जगताप म्हणाले, काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणाची रितसर तक्रार पोलिसांकडे दिली आहे. दोषींवर प्रदेशाध्यक्षांकडून योग्य कारवाई केली जाईल. तोडफोड करणारे कोणाचे कार्यकर्ते होते, हे शोधण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलिसांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी पक्षाला सविस्तर अहवाल सादर केला आहे. पुणे जिल्हय़ातून मंत्रिपदासाठी केवळ संग्राम थोपटे यांचेच नाव सूचविण्यात आले होते. मला पक्षाने जिल्हाध्यक्ष केले आहे. या पदावर मी समाधानी आहे. मंत्रिपदासाठी माझा आग्रह नव्हता. तसेच विश्वजित कदम यांचे नावही मी सुचवले नव्हते, असेही जगताप यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 7 सदस्य आहेत. त्यामुळे आम्हाला एक सभापतीपद द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली आहे. पुणे जिह्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सत्तेत पुण्याला चांगली संधी मिळावी, अशा मागणीचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.