अंनिसच्या वार्षिक अंकाचे जटा निर्मूलन केलेल्या महिलांच्या हस्ते प्रकाशन
सांगली / प्रतिनिधी
” जमदग्नी हा तापट ऋषी होता. बायकोच्या केवळ मनात परपुरुषाचा विचार आला, म्हणून त्याने त्याच्या मुलाला, आईचे मस्तक धडावेगळे करण्याचा आदेश दिला, आणि मुलांनेही तो तंतोतंत पाळला. अशा पुराणकथानी पुरुषांना केवळ संशयावरून, स्त्रीवर हात उचलण्याचे स्वातंत्र्य दिले.” असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक अंकाच्या प्रकाशन समारंभामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाची व्यापकता प्रतिपादन करताना त्यांनी शेतकरी आंदोलनाचा दाखला दिला.” पुरुष शिकारीसाठी जंगलात फिरत असे व स्त्रिया मुलांना सांभाळत गुहेच्या शेजारी बिया पेरत असत. त्यातूनच शेतीचा शोध लागला. शेती मधील महत्त्वाचे शोध स्त्रियांनी लावले आहेत. त्यामुळे सुरुवातीला जमिनीची मालकी स्त्रियांची होती, पुढे पुरुषांनी त्यांना जमिनीवरून बेदखल केले. त्यानंतर कनिष्ठ वर्गीय पुरुषांना वरिष्ठ वर्गीयांनी बेदखल केले आणि आता त्यांच्याही जमीनी काढून घेण्यासाठी कार्पोरेट सेक्टर पुढे आले आहे”.
अंनिवाचे संपादक राजीव देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये कोरोना काळातील अडचणीवर अंनिवाने मात करून अंक प्रसिद्ध केले आणि हा वार्षिक अंक प्रकाशित करून तीस वर्षांची परंपरा कायम राखली हे स्पष्ट केले.
त्यानंतर डॉ.अरुण बुरांडे यांनी नुकतेच जटा निर्मूलन केलेल्या तीन महिलांची ओळख करून दिली, त्यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. नंदिनी जाधव यांनी महाराष्ट्रातील दोनशेच्यावर महिलांचे जटा निर्मूलन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व अंनिवाचे सल्लागार संपादक प्रा.पी.आर.आर्डे यांनी आपल्या भाषणात अंनिवावर आलेली अलीकडच्या काळातील बाह्य आणि अंतर्गत संकटे यशस्वीपणे परतवून लावल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास मुक्ता दाभोलकर, नरेंद्र लांजेवार, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, डॉ.हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. संजय निटवे, डॉ. शाम महाजन, प्रभा पुरोहित, प्रा. प्रविण देशमुख, व्ही. टी. जाधव, सम्राट हटकर इ.कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुहास यरोडकर, सुहास पवार,राजवैभव यांनी केले.