सांगली / प्रतिनिधी
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूरस्थितीमुळे ज्या नागरिकांचे 48 तासापेक्षा अधिक कालावधीकरीता क्षेत्र, घर बुडाल्यामुळे नुकसान झाले आहे, अशांना शासनामार्फत 10 हजार रुपये सानुग्रह अर्थसहाय्य देण्यात येत होते. आता ही अट शिथिल करुन ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले, अशांनाही आता 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
जुलै 2021 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरीत केलेल्या कुटुंबांना कपड्यांकरिता 5 हजार रुपये व घरगुती भांडी, वस्तुंकरिता 5 हजार रुपये असे एकुण 10 हजार रुपये सानुग्रह अर्थसहाय्य देण्यात येत होते. यामध्ये 48 तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र/घर पाण्यात बुडालेले असल्याची अट होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून पुरात वेढल्यामुळे ज्या कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले, अशांनाही 10 हजार रुपये सानुग्रह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पुर्णत: नष्ट झालेल्या घरांसाठी प्रति घर 1 लाख 50 हजार रुपये, अंशत: पडझड झालेल्या (किमान 50 टक्के) घरांसाठी 50 हजार रुपये, अंशत: पडझड झालेल्या ( किमान 25 टक्के) घरांसाठी 25 हजार रुपये, अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के) घरांसाठी 15 हजार रुपये, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी 15 हजार रुपये अशी मदत करण्यात येणार आहे.
अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना मृत पशुधनासाठी दुधाळ जनावरे 40 हजार, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 30 हजार, ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी 20 हजार, मेंढी/बकरी/डुक्कर साठी 4 हजार, कुक्कुटपालन प्रति पक्षी 50 रुपये मदत देण्यात येणार आहे. मत्स बोटी व जाळ्यांसाठी अर्थसहाय्य करताना ज्या बोटीचे अंशत: नुकसान झाले आहे अशांना 10 हजार रुपये, पुर्णत: नुकसान झालेल्या बोटीला 25 हजार रुपये, जाळ्यांचे नुकसान झाल्यास 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
हस्तकला, हातमाग, कारागिर जे स्थानिक रहिवाशी आहेत व ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या अधारे प्रत्येक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीजास्त 50 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जे दुकानदार स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत, अशा दुकानदांरांपैकी अधिकृत नोंदणीकृत व महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियम 1948 खालील परवानाधारक दुकानदाराला पंचनाम्यांच्या अधारे प्रत्येक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीजास्त 50 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
जे टपरीधारक स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदांरापैकी अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना पंचनाम्यांच्या अधारे प्रत्येक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीजास्त 10 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कुकुटपालन शेडच्या नुकसानीपोटी 5 हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे.