प्रतिनिधी/ म्हापसा
उद्योजक गौरव आर्य ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आमदार रोहन खंवटे यांच्याजवळ सबळ पुराव्याची कागदपत्रे नाहीत फक्त त्यांच्याकडे असलेली छायाचित्रे त्यांनी जाहीर केलेली आहे. हे कपील झवेरी की फेवरी हे कोण आहे हे आपणास माहीत नाही. कदाचित त्याने आपल्याबरोबर फोटो काढला असावा. फोटो काढला म्हणजे आपला त्याच्याशी संबंध आहे असे म्हणता येणार नाही. आमदार रोहन खंवटे मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सदानंद तानावडे यांच्यावर नाहक आरोप करू नये. या फोटोवरून एकमेकावर आरोप करणे अर्थही नाही. आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कोणी पुष्पगुच्छ दिला म्हणून सदर व्यक्तीशी संबंध असे होत नाही. जर आमदार खंवटे यांच्याजवळ सबळ पुरावे असल्यास त्या पुराव्याच्या प्रति गुन्हा अन्वेषण विभाग व प्रसार माध्यमाकडे सादर कराव्यात. उगाच नाहक आरोप करू नये. असा सल्ला कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्र्यासह अन्य काही आमदारावर आरोप केल्यावर याबाबत मंत्री लोबो यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, ड्रग्जमुळे गोव्याचे नाव बदनाम होत चालले आहे ही गोष्ट खरी आहे. यासाठी ड्रग्ज पॅडलर्सना पकडण्याची गरज आहे. गोवा हे पर्यंटन केंद्र आहे त्यामुळे येथे मनोरंजनात्मक पाटर्य़ांची अत्यावश्यकता आहे. जर पाटर्य़ा होणार नाही तर पर्यटन केंद्र म्हणून प्रचार करणे बंद व्हायला हवे. पण ड्रग्जच्या पाटर्य़ांना राज्यात थारा देऊ नये. अभिनेता सुशांत सिंग राजपुत मृत्यू प्रकरणी गौरव आर्य यांचे ड्रग्ज कनेक्शन तसेच कपील झवेरी यांच्या ड्रग्ज रेव्ह पार्टीवरून गोव्याचे नाव बदनाम होण्यास अधिक भर पडली आहे. ड्रग्ज हा व्यवहार घातक असून विद्यमान तसेच भावी पिढीला दूर ठेवण्यासाठी राज्यातून अमली पदार्थाचा कायमस्वरुपी नायनाट व्हायला हवा असे मत मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.
उद्योजक गौरव आर्य ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाची अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो व सिबीआय तर कपील झवेरी प्रकरणाची चौकशी गुनहा शाखेतर्फे सुरू आहे. आर्य यांचे कनेक्शन आहे की नाही याबाबतचा निवाडा न्यायालय देणार आहे. पण ड्रग्जवरून गोव्याचे नाव खराब होत आहे ही गोष्ट खरी आहे. ड्रग्जसह गोव्यात बेरोजगारीचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे ड्रग्जचा नायनाट करायलाच हवा असे मंत्री लोबो म्हणाले.
आमदार रोहन खंवटे यांनी राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करावा. सरकारला याबाबत लेखी कल्पना द्यावी. तसेच बेरोजगारी दूर कशी करता येईल याचा अहवाल सरकारला द्यावा. अडीच वर्षाच्या कालावधीत आमदार खंवटे यांनी काहीच काम केलेले नाही. आता विरोधक म्हणून त्यांनी जन हितासाठी काम करावे. आगामी निवडणुकीत कोणाला मते द्यावी हे लोक ठरवतील. त्यामुळे त्याची चिंता त्यांनी करू नये असा सल्ला देत मंत्री लोबो यांनी आमदार खंवटे यांना दिला.