ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे नागपूरचे वकिल सतीश उके यांना आज ईडीने ताब्यात घेतलंय. सतीश उके हे काँग्रेस नेते नाना पाटोलेंचे वकील म्हणूनही ओळखले जातात.दरम्यान, आज पाहटे पाच वाजता ईडीचे पथक उके यांच्या पोहोचले होते. तब्बल सहा तास त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतले. यावर आता उके यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
नाना पटोले यांचे वकील
दरम्यान, विशेष म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिलपत्र देखील सतीश उके यांनीच घेतले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. भाजप नेत्यांविरोधात आरोप करत असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीचं धाडसत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते आणि त्यांचे नीकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यातच आज ईडीने सतीश उके यांच्या घरावर धाड टाकली. सहा तासांच्या चौकशीनंतर सतीश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत.
पुरावे नष्ट करण्यासाठी कारवाई
ईडीने केलेल्या कारवाईनंतर उके यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबीयांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी आले. आमचे मोबाईल जमा केले. मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा त्यांनी दिली. आम्हाला सतीश उके यांचे कागदपत्र हवे आहेत असं ईडीचे अधिकारी म्हणत होते असं कुटुंबीयांनी सांगितलं. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक केसेस केल्या आहेत. त्यातल्या एका प्रकरणाचा निकाल दोन दिवसात लागणार आहे असंही कुटुंबीयांनी सांगितलं.
कुटुंबीयांनी पुढे सांगितलं की, त्यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला. महिनाभरापासून रेकी सुरू होती. कोण काय करतं याची सगळी माहिती घेतली होती. लॅपटॉपमधील भविष्यातील केसेसचे तपशील घेतले. लोया केसचाही त्यामध्ये समावेश आहे. हे सर्व पुरावे नष्ट कऱण्यासाठी घेऊन गेले असून, सूडबुद्धीमुळे हे सर्व झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.