शेजारील राज्यांशी संपर्कात रहा ः मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्यातील नद्यांना महाराष्ट्रातून पाणी मोठय़ा प्रमाणात सोडले जाते. त्यासाठी संबंधित राज्याच्या अधिकाऱयांशी संपर्कात रहा. जलाशयांमधून पाणी सोडण्यात येणार असेल तर नदीकाठावरील गावांना किती धोका आहे याची दखल घ्या. त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पाऊल उचला. हे सर्व करत असताना सतत संबंधित राज्याच्या अधिकाऱयांशी संपर्कात रहा, अशी सूचना बसवराज बोम्माई यांनी अधिकाऱयांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. आता मान्सूनही दाखल होणार आहे. त्यासाठी पूर व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीसंदर्भात शनिवारी अधिकाऱयांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली. मान्सून यावषी एक आठवडा आधीच दाखल होणार आहे. प्रथम तो महाराष्ट्रात दाखल होतो. तेव्हा महाराष्ट्राच्या अधिकाऱयांशी चर्चा करा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागाशी सतत संपर्क ठेवण्यासाठी अधिकाऱयांना नेमणूक करून त्यांच्याशी समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर रस्त्यांवरील अडथळे प्रथम दूर करावेत. त्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव जिह्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
गेल्या आठवडय़ाभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे एक घर पूर्णपणे कोसळले, तर 193 घरांची पडझड झाली आहे. याचबरोबर शेतीचे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. या व्हिडिओ कॉन्फरन्सला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व इतर अधिकारी उपस्थित होते.