कालच आंतरराष्ट्रीय महिला दिन झाला. महिलांच्या समस्या व तिचे अस्तित्व आज जगासमोर आहे. जैविकदृष्टय़ा पुरुष आणि स्त्री खूप निराळे आहेत यात काहीच वाद नाही. त्यांच्या दिसण्याबरोबर, त्यांच्या शरीराची आणि मनाची रचनादेखील भिन्न आहे. माणसाच्या आजूबाजूचा समाज आणि संस्कृती त्याचे/तिचे वर्तन ठरवते. स्त्री म्हटले की आपल्या मनामध्ये कोणती प्रतिमा निर्माण होते? प्रथम म्हणजे आपली आई. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात स्त्रीची पहिली ओळख तिची आई किंवा घरातील वरि÷ स्त्री असते. त्याचप्रमाणे, व्यक्तीच्या आयुष्यातील पुरुषत्वाचे पहिले प्रतीक म्हणजे त्यांचे वडील किंवा घरातले वरि÷ असतात.
लहान मुले आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून, आपल्या आई-वडिलांना निरखून पहात मोठी होत असतात. छोटय़ा छोटय़ा सवयी, समाजातील नियम, वर्तन, या सर्व गोष्टी ते त्यांच्या कुटुंबीयांकडून शिकत असतात. साधारणतः भारतीय घरांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिका ठरलेल्या असतात. घरातील स्त्रीला घरची लक्ष्मी म्हणतात. पण स्त्री व्यावसायिक जीवनात कितीही यशस्वी झाली, तरी घर-संसार सांभाळण्याची, मुलं वाढविण्याची, जबाबदारी तिचीच असते. हे कोणाला सांगावे लागत नाही. ही रीत आपोआप एका भारतीय कुटुंबाला लागू पडते. तसेच पुरुष हा घरचा मुख्य असतो आणि जास्तीच जास्त आर्थिक जबाबदारी त्याच्यावर असते. स्वतःसकट घर, कुटुंब आणि समाज, सर्वांचीच जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलून तो पुढे चालत असतो.
स्त्रियांनी जगभर या अवास्तव अपेक्षांमुळे आणि सामाजिक नियमांमुळे अन्याय सहन केला आहे. त्या विरुद्ध लढा देऊन स्त्रियांसाठी एक स्वतंत्र आयुष्य निर्माण करण्यासाठी आजही संघर्ष सुरू आहे. भारतीय स्त्रीचे स्वातंत्र्य हे पुरुषप्रधान समाजामध्ये अनेक वर्षे दुर्लक्षित केले गेले आहे.
पण त्याचबरोबर याच पुरुषप्रधान समाजाला स्वतः पुरुष जात बळी पडली आहे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. ही काही पुरुष आणि स्त्रियांच्या संघर्षाची तुलना नाही. ते नैसर्गिकरित्याच भिन्न असल्याने त्यांच्या अडचणी कधीही सारख्या नसतील आणि पुरुषसुद्धा समाजाच्या अपेक्षांना बळी पडले आहेत याचा अर्थ स्त्रियांचा संघर्ष कमी महत्त्वाचा होतो असेही नाही. पण जर आपण समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेची अपेक्षा ठेवत असू, तर पुरुषप्रधान समाजाच्या पुरुषांच्या दृष्टिकोनाबद्दलदेखील विचार केला पाहिजे. सुरुवातीपासून विचार करायचा झाला तर जन्माला आल्या आल्या कोणतेही बाळ हे रिकाम्या फळय़ासारखे असते. हळूहळू जसजशी त्याची वाढ होत जाते, तशी त्याला समज यायला लागते. लहानपणी भावंडांबरोबर किंवा मित्रमैत्रिणीबरोबर घरघर खेळताना मुलगी नेहमी डोक्मयावर आईची ओढणी पदर म्हणून घेऊन हातात चहाचा कप बाहेर घेऊन यायची आणि मुलगा खोटय़ा खोटय़ा संगणकावर काम करत बसायचा. तेव्हा या भूमिकांमधला बदल मनातदेखील येत नसावा. खेळताना कधी धडपड झाली आणि मुलगी रडायला लागली की तिला सगळे आधार द्यायचे, समजवायचे. पण तेच मुलगा पडला आणि रडायला लागला की त्याला नाजूक असल्याचे लेबल लावायचे. मुलगा आणि मुलगी वेगळे असले म्हणून लागलेली जखमसुद्धा कमी जास्त दुखते का? मन तर दोघांनाही आहे ना? शारीरिक दुःखपण सारखेच असते ना? मग मुलांनी रडून व्यक्त का होऊ नये? लहानपणापासून मुले आपल्या आईला कामावरून थकून आल्यावरसुद्धा काही आक्षेप न घेता स्वयंपाक करताना बघतात आणि वडिलांना ऑफिसमधून आल्यावर निवांत वर्तमानपत्र वाचताना किंवा चित्रपट बघताना बघतात. त्यामुळे ती सामाजिक अपेक्षांमधून निर्माण झालेली दिनचर्या नसून, जन्मजात असलेली पुरुष आणि स्त्रियांच्या कामांची विभागणी आहे असे भासू लागते.
जसे घराची जबाबदारी मुलीला पार पडायला शिकवले जाते, तसेच मुलांना ‘पुरुषत्व’ शिकवले जाते. पुरुषांसाठी समाजमान्य वर्तन म्हणजे काय? लहानपणापासून कठोरतेची ढाल मनावर चढवायची, इच्छा असो किंवा नसो, आवड नसली तरी एखादा ‘मर्दानी’ व्यवसाय निवडायचा, खात्यात ठरावीक रक्कम जमली की चांगल्या मुलीशी लग्न करायचे, संसार मांडायचा आणि स्वमेहनतीने कमवलेले पैसे कुटुंबाला अर्पण करायचे. रोज दिवसभर कामाला जायचे, घरी आले की घरच्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आणि दुसऱया दिवशी पुन्हा तेच चक्र सुरू. या व्यतिरिक्त जर चुकून कुटुंबावर संकट आले तर त्याची जबाबदारी स्वतंत्रपणे पार पडायची. त्यात डगमगूनदेखील चालणार नाही. घरातील मुख्य पुरुषाने जर आपल्या खऱया भावना व्यक्त केल्या, तर कुटुंबाला आधार कोण देणार? कुटुंबाचा आधार होता होता, त्याच्या मनाचा आधार मात्र कुठेतरी मागे पडतो.
जरी पुरुष जैविकदृष्टय़ा भिन्न असला तरीही, भावना सगळय़ांना सारख्याच अनुभवायला मिळतात. मनात गोष्टी दाबून ठेवल्याने जेवढा एखाद्या स्त्रीला त्रास होईल, तेवढाच त्रास पुरुषालादेखील होतो.
या भावना दाबून ठेवण्याच्या सवयीमुळे माणसामध्ये एक अवास्तव कठोरपणा येतो मग याचा परिणाम त्याच्या नात्यांवर होतो. हे चक्र पिढय़ा न् पिढय़ा चालू राहिल्यामुळे समाजामध्ये आजही तीच स्थिती आहे.
काय हरकत आहे जर एखादा लहान मुलगा पडल्यावर रडला तर? दुःख ही एक भावना आहे. यात कोणतेही स्त्री पुरुष भिन्नत्व नाही. मग इतक्मया नैसर्गिक गोष्टीला पुरुषत्व आणि स्त्रीत्वाचे लेबल कुठून लागले? तसेच, पाककला, चित्रकला, शिवणकाम आणि इतर ‘स्त्रीलिंगी’ वाटणाऱया गोष्टी फक्त काही कौशल्ये आहेत. आत्तापर्यंत नकळत चालत आलेल्या पद्धतींकडे आता नवीन दृष्टिकोनाने पाहण्याची गरज आहे.
मुलांना मर्दानी होण्यापेक्षा त्यांच्या खऱया व्यक्तिमत्वाला जगासमोर मांडण्याचे प्रोत्साहन आपण समाज म्हणून दिले पाहिजे. घरामध्येदेखील स्त्रीपुरुष समानता पाळली पाहिजे. पुरुष आणि स्त्री या व्यतिरिक्त माणूस म्हणून एक दुसऱयाला सहकार्य केले पाहिजे. कधी त्याच्या डोळय़ातून एक अश्रू बाहेर आला तर ते तिरस्काराने नाही तर प्रेमाने टिपले पाहिजेत. डोळय़ातल्या त्या एका अश्रूमुळे त्याचे पुरुषत्व कमी होत नाही. मोकळेपणाने वावरायची निवड करण्याचा अधिकार प्रत्येक पुरुषाला मिळाला पाहिजे. कारण जगासमोर एक मुखवटा बनून वावरण्यात महानता नाही. जगात स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करायला हिम्मत लागते. आणि जो पुरुष स्वतःचे खरे व्यक्तिमत्व जपतो, त्यातच तुम्हाला खरे पुरुषत्व आढळेल!
-श्राव्या माधव कुलकर्णी