पुण्यभूषण ते पुलोत्सवचा ऊलगडला प्रवास
ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात, आठ नावे भाईंनी सुचवली……. सुनीता बाईंनी कसून केलेली विचारपूस….. पुलंची ओळख मी करुन देणार हा आलेला निनावी फोन कवयित्री शांताबाईंचा होता….तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी पुलं मुळेच माझे वक्तृत्व बहरले हि जाहीर प्रांजळ कबुली अशा अनेक आठवणींनी फेसबुक लाइव्ह ऑनलाईन मैफील रंगली.
निमित्त होते पुलंच्या २० व्या स्मृतीदिनाचे, आम्ही एकपात्री, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुण्यभूषण ते पुलोत्सव ‘आणि’ तुमचे आमचे पुलं’ या फेसबुक लाइव्ह आगळ्यावेगळ्या अभिवादनाचे.
‘त्रिदल ‘संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांच्याशी आम्ही एकपात्री, महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष चोरडिया यांनी संवाद साधला आणि जगभरातल्या रसिकांना हि पर्वणी अनुभवता आली. यात देसाईंनी पुण्यभूषण पुरस्काराची सुचलेली संकल्पना, पुलंनी तो स्विकारल्या नंतरची भावना, बालगंधर्व रंगमंदिरात झालेली अभूतपूर्व गर्दी ते पुलंच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त जगभरात साजरा झालेला ‘ ग्लोबल पुलोत्सव’ अशा विविध स्मृतींना ऊजाळा देत हा संवाद पुलमय झाला.
त्यानंतर आम्ही एकपात्रीचे कलाकार वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ या पुस्तकातील पुलंच्या प्रस्तावनेचे अभिवाचन केले. बंडा जोशी यांनी आकाशवाणीतील पुलंची आठवण सांगितली, डॉ. कविता घिया यांनी पुलंच्या कार्याला आणि त्यांच्या चित्रपटांना शब्दात गुंफुन स्वरचित कविता सादर केली, रत्ना दहिवेलकर यांनी पुलंना आलेल्या रसिकांचे अनुभव कथित केले, मारुती यादव यांना लिखाणासाठी पुलंनी कसे प्रोत्साहन दिले हे सांगितले तर गायिका अनुपमा खरे यांनी कौसलेचा राम, नाच रे मोरा हि गाणी गाऊन तर या सर्व ऑनलाईन मैफीलीचे बहारदार सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी करून हे सप्तरंगी अभिवादन पुलंना अर्पित केले.