आमचा बालमित्र नागजंपी ऊर्फ नाग्या कधीही दिसला किंवा भेटला की मला पुलंच्या रावसाहेबांची आठवण येते. एकदा पुल कुठल्याशा चित्रपटासाठी पदं लिहिण्याच्या खटपटीत होते. रावसाहेबांनी त्यांना एका खोलीत बसवले होते आणि कोणी डिस्टर्ब करणार नाही याची दक्षता घेतली होती. शिवाय पहिल्या ओळीच्या शेवटी ‘प्राची’ शब्द आला म्हणून प्राचीशी यमक देखील सुचवले होते. दोन महिन्यांपूर्वी नाग्या संकटात सापडला. त्याच्या बायकोच्या भिशी ग्रुपने व्हॅलेंटाईन सप्ताहानिमित्त चारोळी स्पर्धा आयोजित केली. प्रत्येकीच्या नवऱयाने बायकोवर चारोळी लिहायची. पहिल्या तीन चारोळय़ांना अनुक्रमे पैठणी, साडी आणि डेस मटेरियल अशी तीन पारितोषिके ठेवली होती. या स्पर्धेत चारोळी लिहिण्यासाठी नाग्याची बायको गेले दोन महिने त्याच्या मागे लागली होती आणि नाग्या रडकुंडीला आला होता. चारोळीऐवजी बासुंदी-पुरी तरी मागायची. बायकोने पैठणी मागितली असती तर घेऊन दिली असती. एखाद्या महागडय़ा हॉटेलात जेवायला न्यायचा आग्रह केला असता तर नेलं असतं. पण कविता? नाग्याची अगदी फे फे उडाली होती. झोप गायब झाली होती. त्याने रुबायांची, चारोळय़ांची अनेक पुस्तके आणून चाळली. पण व्यर्थ. शेवटी नाग्या मला शरण आला.
“माझ्या बायकोवर एक रोम्यांटिक चारोळी लिहितंस काय?’’ “आं? वहिनीवर मी रोम्यांटिक कविता लिहायची? मला त्या चपलेने मारतील की.’’ “तसं नाय रे. तू फक्त लिही आणि मला दे. मी ते लिहिलंय असं मी तिला सांगतंय.’’ “पण का? ही काय भानगड आहे?’’ मग नाग्याने मला ती भानगड सांगितली. मी विचारात पडलो. शाळेत छडीच्या भीतीने पाठ केलेल्या कविता वगळल्या तर उरलेल्या आयुष्यात माझा कवितेशी संबंध आला नव्हता. पण मित्रासाठी काहीतरी करायला हवं. नाग्याला मी सुचवलं की आपण लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन सीसीडीमध्ये जाऊन बसू. तिथं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. कॉफीचं बिल तू द्यायचं. नाग्या कबूल झाला. आम्ही सीसीडीत जाऊन बसलो. दरम्यान नाग्याने दोन ओळी जुळवल्या होत्या नंदिनीला बघून माझ्या झालंय रे मी पुलकित आता फक्त पुढच्या दोन ओळी जुळवायच्या. पण पुलकित शब्दाला यमक काही सुचेना. आम्ही दोघे ट्राय मारत होतो. कलंकित, चकित, थकित, बुडीत, तडित वगैरे असंख्य पर्याय सुचले आणि आम्ही नाकारले. कॉफीचा शेवटचा घोट घेत असतानाच नाग्यानं साक्षात रावसाहेबांच्या शैलीत मला विचारलं,
“पुलकितला ते टूलकिट यमक बसतंय का, बघ की’’
मी कपाळावर हात मारून घेतला.