ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेनंतर चकमक सुरू झाली आणि आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे. यामध्ये भारतीय लष्कराला यश मिळत असून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे.
दरम्यान या कारवाई नंतर काश्मीर पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराने नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्यही सामील होते.