ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात 14 फेब्रुवारी 2019 मध्ये सीआरपीएफ पथकावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी भर संसदेत दिली.
इम्रान सरकार भारताला घाबरणारे सरकार आहे, असा आरोप पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना चौधरी म्हणाले, पुलवामातील आत्मघातकी हल्ल्यात 44 भारतीय जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. इम्रान खान सरकारची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
आम्ही भारताला त्यांच्या घरात घुसून मारले. पुलवामाच्या घटनेत आपल्या सर्वांचे योगदान असल्याचे मी मानतो, असेही चौधरी म्हणाले.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश ए मोहम्मदचे अड्डे उध्वस्त केले होते.