पंतप्रधान मोदींची हुतात्म्यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सैनिकांच्या बसवर केलेल्या हल्ल्याच्या तिसऱया स्मृतिदिनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यात 40 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.
हा हल्ला 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी झाला होता. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सैनिकांना घेऊन चाललेल्या बसवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार आदळवून हा हल्ला केला होता. त्यात कारचा चालक दहशतवादीही ठार झाला होता. त्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.
भारताचे चोख प्रत्युत्तर
या हल्ल्याच्या बरोबर 12 व्या दिवशी भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर विमानांनी बाँबफेक करुन प्रत्युत्तर दिले होते. भारताच्या त्या विमानहल्ल्यामध्ये किमान 50 दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक मारले गेले होते. नंतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही अनेक दहशतवादी ठार झाल्याची बाब स्पष्ट केली होती. हा पाकिस्तानला मोठाच धक्का होता. पंतप्रधान मोदींनी ट्विटर वरुन यासंबंधीचा संदेश सोमवारी प्रसारित केला.