शिक्षणाला वयाचे बंधन नाही. कारण माणूस रोज काही ना काही शिकत असतो. जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईनने म्हटले आहे की, ‘शिक्षण म्हणजे केवळ वस्तुस्थिती पाठ करणे नव्हे, तर मेंदूला विचार करायला शिकवणारे प्रशिक्षण आहे.’ योग्य ते शिक्षण आणि मार्गदर्शन माणसाचे पुरेपूर व्यक्तिमत्त्व विकसित करायला मदत करतात. ते सार्वत्रिक व्यक्तिमत्त्व घेऊन माणूस जेव्हा जगात पदार्पण करतो, तेव्हा त्याच्यात अंतहीन क्रांती घडवण्याचे संभाव्य असते. एखादा माणूस जगात कसा वावरतो, त्याची कृत्ये काय आहेत या सगळय़ा गोष्टींवर त्याला बालपणापासून मिळालेले शिक्षण, अनुभव आणि संस्कार यांचा अंदाज लावता येतो. आणि म्हणूनच, प्रत्येकाला बालपणापासूनच योग्य ते शिक्षण, जाणीव आणि संस्कार दिले पाहिजेत. भारतीय शिक्षणप्रणाली अजूनही पूर्वपार चालत आलेल्या अभ्यासक्रमाला अनुसरून शाळा चालवतात. कित्येक वर्षांपूर्वी ठरवलेली परीक्षा घेण्याची पद्धत अजूनही चालूच आहे. ही पद्धत पक्षपाती आणि अन्यायकारक आहे कारण प्रत्येक माणूस हा अद्वितीय असतो. त्याच्या क्षमतेची तुलना इतर कोणाशी करणे गैर आहे. पण पुस्तकी ज्ञान हे आज महाजालावर (इंटरनेट) एका क्लिकवर उपलब्ध आहे. कोणीही आज जगाच्या पाठीवरची कोणतीही माहिती अगदी काही मिनिटांमधे उपलब्ध करू शकतो. म्हणूनच सध्याच्या काळात, माणूस पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, व्यावहारिक ज्ञानाच्या शोधात आहे. किती वर्षे तेच तेच धडे आपण मुलांना देत राहणार? आपल्यालादेखील माहिती आहे की, अर्ध्यापेक्षा जास्ती धडय़ांमध्ये शिकलेला ज्ञानाचा उपयोग हा तथ्याचा साठा गोळा करायला होतो आणि व्यावहारिक जीवनात त्याचा काही उपयोग नाही. सतत बदलत्या जगाबरोबर आपणसुद्धा थोडे बदल घडवणे आवश्यक नाही का? तीच तीच गोष्ट करत राहून क्रांती घडवण्याची अपेक्षा चुकीची आहे. क्रांती तेव्हाच घडेल, जेव्हा काळाची गरज ओळखून माणूस त्याची वागणूक आणि समज बदलेल.
आता वेळ आली आहे की आंधळेपणाने पुस्तकातील धडे पाठ न करता, जगदोद्धाराला आवश्यक गोष्टी मुलांना शिकवून, त्यांना एक जबाबदार नागरिक बनवायची! याचा अर्थ पुस्तक, धडे, गणित आणि इतर अटळ विषय अभ्यासक्रमातून काढून टाकणे असा होत नाही. याच पुस्तकी ज्ञानाबरोबर काही अतिरिक्त गोष्टी भारताच्या शिक्षणप्रणालीत समाविष्ट केल्या पाहिजेत.
1. वित्त आणि बचत
जगाचा केंद्र बिंदू आहे पैसा आहे. कोणतीही वस्तू या जगात फुकट मिळत नाही आणि पोट पाण्यासाठी पैसे कमवायला प्रत्येक जण दररोज खूप कष्ट करत असतो. मुलांना जर या आर्थिक प्रणालीची जाणीव शाळेतच करून दिली तर त्यांना कष्टाने मिळवलेल्या पैशाची किंमत कळेल आणि ते मिळवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याची समजसुद्धा. यामुळे लोकांसोबत होणारे घोटाळे, फसवाफसवी, पैशाचे नुकसान कमी होईल.
2. मानसिक आरोग्य जागरूकता-
मेंदू हा देखील शरीराचाच एक भाग आहे हे आपण बरेचदा विसरतो. मेंदूमुळे पूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित चालते. अशा वेळेला त्या मेंदूचे आरोग्य वर खाली झाले, की त्याचा परिणाम नुसता मानसिक नाही, तर शारीरिकदेखील असतो. माणूस हा सर्वश्रे÷ प्राणी मानला गेला असला तरी बरेचदा तो दुर्बल होतो. कारण त्याच्याकडे असे एक वरदान आहे, जे इतर प्राण्यांकडे नाही. उंच, बुटका, राजा, प्रजा, भिकार, सावकार, सर्वांमध्ये साम्य काय आहे तर त्या भावना. त्या जपणे हे तेवढेच गरजेचे आहे. मुलांना शाळेपासूनच हे शिकवले पाहिजे की भावना व्यक्त करणे गैर नाही, त्यांची काळजी घेणे व स्वतःहून घेता येत नसली की मदत मागणे गैर नाही.
3. मानवी हक्क-
कित्येकदा आपण ऐकतो, गुन्हा नसताना माणसाला शिक्षा होते. श्रीमंत लोक त्यांच्या ओळखींमुळे चांगला वकील आणून स्वतःचा बचाव करू शकतात, पण सामान्य माणूस, ज्याच्याकडे त्याचा हक्काचा असे म्हणण्यासारखा फक्त स्वाभिमान आहे, तो सत्तेसमोर निर्बळ ठरतो. याचमुळे, सामान्य माणसाचे कित्येकवेळा विनाकारण शोषण होताना आपण पाहिले आहे. आर्थिक स्थितीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला माणूस म्हणून न्याय मिळायचा अधिकार आहे. ही जागरूकता लहानपणापासून प्रत्येक मुला-मुलीला दिली पाहिजे. न्याय हा निःपक्षपाती आणि
कायद्यानुसार मिळाला पाहिजे, माणसाचा सामाजिक दर्जा बघून नाही. मानवी हक्काबद्दल जागरूकता पसरली की हिंसादेखील कमी होईल कारण कायद्याची भीती असली की माणूस गुन्हा करण्याआधी अनेकदा विचार तरी करेल.
4. आत्मरक्षण-
कायदा जरी कठोर असला तरी काही अविवेकी मनुष्य स्वतःच्या अहंकारापायी चुकीचा मार्ग निवडतातच. अशा माणसांना घाबरून गेले की त्यांची शक्ती अजून वाढते. चूक आणि बरोबरमध्ये भेद करण्याएवढीसुद्धा त्यांच्यात विवेकबुद्धी नसते आणि अशी माणसे गुन्हा करताना पुढे मागे बघत नाहीत. अशा वेळेला, आपण सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा करणे आणि काळजी करणे हे मुलांना शिकवणे खूप गरजेचे आहे. मुलगा असो किंवा मुलगी, सुरक्षा प्रत्येकाला मिळाली पाहिजे. मूलभूत आत्मरक्षण तंत्र हे अभ्यासक्रमाचा भाग असलाच पाहिजे. जर खरंच वाढत्या गुह्यांविरुद्ध लढा द्यायचा असेल, तर समाजानेच बलवान बनले पाहिजे.
5. सर्जनशीलता-
विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास या सर्व गोष्टी आर्थिक आयुष्य सुरक्षित ठेवायला मदत करतात. पण नृत्य, गाणे, चित्रकला, लेखन इत्यादी गोष्टी माणसाला जगण्याची एक नवीन उमेद देतात. सततच्या कामामुळे मेंदूवर आणि मनावर ताण येतो आणि त्यामुळे माणूस उदास, निराशदेखील होऊ शकतो. अशा वेळेला जर व्यक्तिमत्त्वामध्ये सर्जनशीलता विकसित केली, तर माणसाचे मन मोकळे होते आणि त्याला ताणतणावाबाहेर पडायचे एक साधन मिळते. प्रत्येक मुलाची आवड, बुद्धिमत्ता, क्षमता वेगळी असते. त्याची शक्ती आणि कमकुवतपणा ओळखून त्याच्या प्रतिभेचे पालनपोषण केले पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यातल्या दोषांना राक्षसी नसून मानवी रूप दिले पाहिजे आणि सहानुभूतीने त्या त्रुटींचे सामर्थ्यामध्ये रूपांतर केले पाहिजे. जर या गोष्टी लक्षात ठेवून बदल घडवला, तर क्रांती नक्कीच होईल.
श्राव्या माधव कुलकर्णी