गांधीनगर पोलीसांत गुन्हा नोंद,दोघे ताब्यात
उचगाव / वार्ताहर
उचगाव ता.करवीर येथे पूणे बेंगळूर महामार्गावर ११ देशी बैलांना कत्तलखान्यात नेत असताना सामाजिक कार्यकर्ते यांनी पकडून त्यांना गांधीनगर पोलिसांच्या मदतीने जीवदान देणेत आले. याबाबत गांधीनगर पोलिसांत मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी वय २७ रा. पुणे यांनी फिर्याद दिली.
याबाबची अधिक माहीती अशी कि, कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव येथील जनावरांच्या बाजारातून दर सोमवारी मोठ्याप्रमाणात गायी व बैल कत्तलीसाठी घेऊन जात असतात. दि.२८ रोजी एका आयशर टेम्पो नं एम एच ०९ सी यू ०८०४ मध्ये बैल भरून कर्नाटक येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. स्वामी व त्यांचे कोल्हापूर येथील विश्वासू सहकारी यांनी गांधीनगर पोलिसांच्या मदतीने हा टेम्पो ताब्यात घेऊन टेम्पोंची पाहणी केली असता टेम्पोंत एकूण ११ देशी बैल दाटीवाटीने कोंबून भरलेल्या अवस्थेत दिसले. काही बैलांना जखमा झालेल्या होत्या. पोलिसांनी टेम्पो चालक व क्लिनर यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी अतुल अरुण पवार आणि क्लिनर विकास तुकाराम कांबळे दोघे रा. वॉर्ड नं ५ भीम नगर पेठ नाका जि. सांगली. असे सांगितले
तसेच ही जनावरे सचिन साळुंखे रा पेठनाका याने बाजारात भरून देऊन संकेश्वर ( कर्नाटक ) येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.त्यांच्याकडे कोणताही वाहतूक परवानाही नव्हता. गांधीनगर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व जनावरे संकल्प सिद्धी गोशाळा हेरले येथे सुखरूप सोडण्यात आले.
या कारवाईत विजय गुळवे प्रतीक भेगडे, आकाश थोरात, कृष्णा सातपुते, श्रेयस शिंदे, कुंदन सावंत, चेतन धाडवे, संदीप घेवारी, जयदीप सुर्यांवंशी, शाम घायवट, आकाश गुरव, ऋषिकेश डोइफोडे, लखन माने, मयूर सावंत, प्रतीक माळी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन अतुल अरुण पवार आणि क्लिनर विकास तुकाराम कांबळे दोघे रा.वॉर्ड नं ५ भीम नगर पेठ नाका जि. सांगली. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास गांधीनगर पोलिस करीत आहेत.