पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची ग्वाही
वार्ताहर/ निपाणी
संततधार पाऊस, धरणातून वाढलेला पाण्याचा विसर्ग आदी कारणामुळे निपाणी, चिकोडी तालुक्याला महापुराचा फटका बसला. यामध्ये अनेकांच्या घरकुलांचे नुकसान झाले. संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडून गेले. शेती पिकांची मोठी हानी झाली. अशा नुकसानग्रस्त पूरग्रस्तांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. पूरग्रस्तांना मदत निधी देऊन त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
संततधार पाऊस आणि महापूर आदी कारणामुळे निपाणी तालुक्याला मोठा फटका बसला. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी शनिवारी जत्राट व भिवशी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी घरकुलांचे झालेले नुकसान, वेदगंगेच्या नदीपातळीची पाहणी, शेतीपिकांचे झालेले नुकसान, मंदिरांची झालेली हानी याची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री कारजोळ यांनी पडलेल्या घरांची पाहणी करताना नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. तात्कालिक मदत मिळाली का?, याची विचारणा केली. त्याचप्रमाणे अधिकाऱयांना सूचना देताना नुकसानीचा सर्व्हे पारदर्शी पद्धतीने करा, प्रत्येक नुकसानग्रस्ताला त्याच्या नुकसानीप्रमाणे योग्य ती मदत मिळाली पाहिजे, असे सांगितले. यावेळी त्यांनी भिवशी येथील मंदिरांचीही पाहणी केली.
याप्रसंगी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे उपाध्यक्ष एम. पी. पाटील, भाजपा ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, हालशुगरचे संचालक समित सासणे, माजी जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, प्रकाश शिंदे, प्रशांत पाटील, संतोष शिरोळे, सचिन कोल्हे, विजय जबडे, सुधाकर थोरात आदी उपस्थित होते.