वार्ताहर/ निपाणी
मंत्री शशिकला जोल्ले यांनी ममदापूरला भेट देऊन ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थ व महिलांनी महापूर, अतिवृष्टी नुकसानीचा सर्व्हे करताना आणि मदतनिधी वितरणात पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी केल्या. अधिकारी वर्गाकडून सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच मंत्री शशिकला जोल्ले यांनी अधिकाऱयांना धारेवर धरताना निःपक्षपाती काम करा. प्रत्येक नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई मिळवून द्या. ही कार्यवाही येत्या सात दिवसात व्हायला हवी, अन्यथा निलंबन करु असा इशारा दिला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महापूर व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरकुलांचा ग्रामविकास अधिकारी, ग्रामलेखाधिकारी यांनी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हे केला. घरकुल नुकसानीच्या स्थितीवरुन अ, ब, क अशी वर्गवारी करुन नुकसान भरपाईची मदत निश्चित करण्यात आली.
या झालेल्या सर्व्हेमध्ये संबंधित अधिकाऱयांनी पक्षपातीपणा केल्याची माहिती नागरिकांच्या तक्रारीतून पुढे आली. तक्रारीची सत्यता लक्षात घेऊन मंत्री जोल्ले यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह विकास अधिकारी व ग्रामलेखाधिकाऱयांना खडसावले. यापुढे अशा तक्रारी चालणार नाहीत. संबंधित नुकसानीचा पुन्हा एकदा सर्व्हे करा. सर्व्हेमध्ये पारदर्शकता आली पाहिजे असे सांगितले.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, अधिकाऱयांनीही निःपक्ष काम केले पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे. पूरग्रस्त मदत निधी, किसान सन्मान योजनांचा लाभ अजून कोणाला मिळाला नसल्यास अर्ज करावेत, असे आवाहन केले. याच प्रकारची भेट हुन्नरगी येथे देऊनही नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जि. पं. सदस्य सिद्धू नराटे, बाळासाहेब कदम, बाबासाहेब गोरवाडे, सिताराम पाटील, संजय आवटे, जयदेव चव्हाण, प्रकाश पाटील, बाबासाहेब बेलेकर, जे. डी. कदम, रविंद्र मधाळे, गजानन मराठे, लक्ष्मण शिंदे, सतीश किल्लेदार, कल्लाप्पा नाईक, महादेव बोते, शशिकांत किल्लेदार, राजू शामन्नावर, धोंडीराम कांबळे, प्रकाश देसाई, कल्पना पाटील, शांता किल्लेदार, राजू मुल्ला, आण्णाप्पा कांबळे, राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.