स्थलांतरित कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळालंच पाहिजे
वार्ताहर / बोरगाव
महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने स्थलांतरित झालेल्या प्रत्येक कुटुंबात सानुग्रह अनुदान मिळालेच पाहिजे पूरबाधित पिकांचे वस्तूनिष्ठ पंचनामे करून त्या पिकांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. वाळवा तालुक्यातील महापुराने बाधित झालेल्या बोरगाव, बहे, शिरटे, रेठरे हरणाक्ष, जुनेखेड-नवेखेड आदी गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोनामुळे भाजीपाला, फळ उत्पादक, दूध उत्पादक उध्वस्त झाला आहे यातून वाचलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला महापुराचा जबर फटका बसला आहे. उभी पिके महापुरात पाण्याखाली गेल्यामुळे पिके सुपडासाफ झाली आहेत. स्थलांतरामुळे दुभती जनावरं भाकड होऊन दूध उत्पादनात मोठा फटका महापुरामुळे बसला आहे.
यावेळी माजी उपसरपंच प्रमोद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई, विकास सूर्यवंशी, स्वाभिमानी संघटनेचे भागवत जाधव, यु ए संदे, जालिंदर भोसले, रविकुमार माने,प्रकाश देसाई, पंडित संपकळ, शहाजी पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह पूरबाधित शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शैक्षणिक फी माफ करा
कोरोनामुळे गेली काही महिने बंद असलेल्या शाळा व महाविद्यालय चालू करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे महापुरामुळे नदीकाठचा पालक उध्वस्त झाला आहे त्याच्या पाल्याला शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश घेताना त्याची शैक्षणिक फी माफ करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले.