वाकरेत आपत्ती व्यवस्थापन बैठक
प्रतिनिधी / वाकरे
आगामी पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन गतवर्षीच्या पूरग्रस्तांना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी पर्यायी व्यवस्था काय केली याबाबत ग्रामपंचायतीने नोटिसा द्याव्यात, तसेच पूर आल्यास त्यांची व्यवस्था शाळांमध्ये करावी आणि त्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे अशा सूचना करवीरच्या तहसिलदार शितल भामरे-मुळे यांनी दिल्या.
वाकरे (ता. करवीर) येथील विद्यामंदिरमध्ये आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तहसीलदार भामरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते. करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांनी ग्रामस्थांना आरोग्य ॲपची माहिती देऊन गरज पडेल तिथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करावे, त्यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात सतत कार्यरत राहावे असे आवाहन केले.
प्रा.एस.पी.चौगले यांनी गतवर्षी महापुरात अंशतः पडझड झालेल्या पूरग्रस्तांना पैसे मिळाले नसल्याचे सांगितले, तसेच आगामी पावसाळ्यात बालिंगे येथे महापुराच्या काळात कायमस्वरूपी बोटीची व्यवस्था करावी, बालिंगा- दोनवडे दरम्यान महापुराच्या रस्त्यावर लोखंडी साकव बांधावे अशी मागणी केली.माजी उपसरपंच कुंडलीक पाटील यांनी गतवर्षी महापुरात नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. गुंडा सातपुते, विजय पाटील- माळी यांनी पंतप्रधान किसान योजनेचे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे सांगितले. महादेव पाटील यांनी सातबारा नावावर नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले नसल्याचे सांगितले.
या बैठकीला उपसरपंच शारदा पाटील, पं.स.सदस्य अविनाश पाटील, सर्कल नामदेव जाधव, तलाठी संध्या कुंभार, प्रा. एस. ए. पाटील, पोलीस पाटील सुरेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक चव्हाण, विविध संस्थांचे पदाधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील यांनी आभार मानले.
यावेळी करवीरच्या तहसिलदार शीतल भामरे- मुळे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सरपंच वसंत तोडकर, पं. स. सदस्य अविनाश पाटील, पोलीस पाटील सुरेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.