उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे आवाहन
प्रतिनिधी /काणकोण
2009 साली ज्यावेळी काणकोण तालुक्यात महापूर आला होता त्यावेळी गोव्यातील विविध भागांतील नागरिक काणकोणवासियांचे अश्रू पुसण्यासाठी धावून आले होते. आज ज्या भागांत पुरामुळे लोकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत त्यांना मदत करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे काणकोणचे आमदार या नात्याने आपण काणकोणच्या तमाम जनतेला हांक मारत असून प्रत्येकाने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी केले आहे.
ज्या लोकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत त्यांची यादी सरकारकडे असून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत रक्कम जमा केल्यास त्यात पारदर्शकता दिसून येईल. म्हणून काणकोणच्या जनतेने मुख्यमंत्री साहाय्यता निधीत आपली रक्कम जमा करावी. प्रत्येक पंचायतीने आणि नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून ज्या व्यक्ती अन्नधान्य, कपडे, भांडी यासारख्या वस्तू देऊ इच्छितात त्यांनी त्या आपआपल्या पंचायतीमध्ये 10 ऑगस्टपर्यंत जमा कराव्यात. याकामी स्थानिक पंचायती, नगरपालिका, स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभेतील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जे विधान केले त्याचा विपर्यास करण्याचे काम सध्या काही ठिकाणी चालू असून मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी एक पालक या नात्याने आपण सहमत असल्याचे मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले. जनतेची सुरक्षा सांभाळणे हे सरकारचेच काम आहे. याचा अर्थ पालकांनी आपली जबाबदारी झटकून टाकणे संयुक्तिक नाही. यापूर्वी मुले 7 च्या आत घरात येत असत. आज प्रत्येकाचा जीवनक्रम बदललेला आहे. म्हणून आजच्या पिढीने मिळेल तसे वागणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्री सावंत यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी काणकोण पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी स्पष्ट केले. यावेळी काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष नंदीप भगत, सचिव दामोदर च्यारी उपस्थित होते.
काणकोणचे कृषी घर त्याचप्रमाणे नवीन पालिका कार्यालय प्रकल्पाला अर्थ खात्याची मंजुरी मिळालेली आहे. यापुढे काम कधी सुरू करायचे ही जबाबदारी ठेकेदारांची आहे. त्याचप्रमाणे नवीन इमारतीच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी जुनी इमारत मोकळी करून देण्याचे काम पालिकेचे आहे, असे फर्नांडिस म्हणाले.