प्रतिनिधी / सांगली
राज्यातील पूरग्रस्त भागातील वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. वीजबिल माफ करण्याचा अधिकार ऊर्जामंत्र्यांचा नसून तो मंत्रीमंडळाचा आहे. त्यामुळे फक्त बिल वसुली थांबणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. तसेच सांगली महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्याचीही कसून चौकशी केली जाईल, असे आदेशही त्यांनी दिले. या महापुरामुळे जिल्ह्यातील वीज मंडळाचे 35 कोटीचे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला त्यानंतर त्यांनी भारती हॉस्पिटल येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील अनेक जिल्ह्यात महापूर आला आहे. या महापुराने लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अनेकांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे. या महापुरातून लोक सावरले आणि त्यांचे जीवनमान व्यवस्थित सुरू झाल्यानंतरच ही वसुली केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत वीजबिल माफ केले जाणार नाही. कारण पूर्वीच्या सरकारकडून 56 हजार कोटीपेक्षा अधिक असे वीज कंपनीवर कर्ज केले आहे. त्यामुळे आता पुन्हा कर्जाचा डोंगर आपण वाढवू शकत नसल्याने वीजबिल माफ होणार नाही आणि ती माफ करण्याचा अधिकार मंत्रीमंडळाकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या वीजबिलाच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
महापालिकेत वीजबिलाचा जो घोटाळा झाला आहे. त्या घोटाळ्याची चौकशी केली जाईल तसेच यामध्ये जे दोषी आहेत. त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा आदेशही त्यांनी दिला. महापालिकेत कोट्यावधी रूपयांचा वीजबिल घोटाळा झाला आहे. याची माहिती आपणास नसल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी कबूल केले. पण आता माहिती झाली आहे तात्काळ आपण याबाबत चौकशीचे आदेश देतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नऊ लाख वीज जोडण्या बंद पडल्या
राज्यात पुरामुळे 170 गावातील नऊ लाख वीज जोडण्या बंद पडल्या होत्या. पण वीज मंडळाच्या कर्मचाऱयांनी यातील सात लाख 87 हजार वीज जोडण्या पुन्हा एकदा जोडल्या आहेत. उर्वरित जोडण्याही लवकरात लवकर जोडल्या जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच सन 2005, 2019 आणि 2021 या महापुराचा अंदाज घेवून यापुढील काळात विद्युत जनित्रे महापुरात बुडणार नाहीत यादृष्टीने ते मोठÎा उंचीवर बसविण्यात येतील त्याप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. 2019 मध्ये मोठा महापूर आला होता. त्यावेळी जिथेपर्यंत पाणी आले होते त्याच्यापेक्षाही उंच अशी जनित्रे बसविली जाणार असल्याचे सांगितले. या महापुरात वीजमंडळाचे जवळपास 35 कोटीचे नुकसान झाले आहे. अनेक मोठे टॉवर तसेच विजेचे खांब, जनित्रे यांचे नुकसान झाले आहे. हे सर्व दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीशी जुने नाते
नितीन राऊत यांनी सांगली जिल्हÎाशी आपले जुने नाते असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, डॉ. पतंगराव कदम यांच्याशी माझे जवळचे नाते होते. तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांचे वडिल राजारामबापू पाटील यांच्याबरोबरही काम केल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पिढीतील विश्वजीत कदम यांच्याबरोबर आपले नवे नाते चांगलेच जमले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.