जिल्हा प्रशासनाचे पावसाळय़ापूर्वी नियोजन : आपत्ती व्यवस्थापन विभागाची संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी सज्जता
कोल्हापूर/प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि महापुरामुळे गतवर्षी 2019 मध्ये कोल्हापूर जिल्हय़ाला प्रचंड मोठा फटका बसला होता. मनुष्यहानी झाली नसली तरी कृषी क्षेत्रासह सांपत्तिक नुकसान झाले होते. कोल्हापूर शहरातही महापुराचे पाणी घुसल्याने हानी झाली होती. गतवर्षीचा अनुभव पाहून जिल्हा प्रशसानाने यंदा पावसाळय़ापूर्वीच दक्षता घेतली आहे. पूरबाधित क्षेत्रातील तब्बल 380 गावांना महापुराच्या काळात दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आगामी काळातील महापुराचे शक्यता गृहित धरून आपली यंत्रणा सज्ज करण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील रेडझोनमधून रहिवास क्षेत्रही आपत्ती व्यवस्थापनाच्या रडावर आहे.
पंचगंगानदीच्याकाठावरीलगावांवरनजर
गतवर्षी पंचगंगा नदीने उच्चांकी 43 फूट इतकी पाणीपातळी गाठली होती. नदी काठच्या बहुतांश गावात पाणी घुसले होते. काही गावांना तर संपूर्णपणे महापुराच्या पाण्याने वेढले होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेला होता. जिल्हय़ाचा संपर्क अन्य जिल्हय़ाशी तुटला होता. गावागावांचा संपर्क तुटल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह सामाजिक संस्था, संघटनांनी महापूर काळात केलेले कार्य यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा लाभला होता. हजारो एक जमीन पाण्याखाली गेल्याने ऊसासह इतर पीकांचे नुकसान झाले होते. आता गतवर्षीचा अनुभव पाहून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी एक आढावा बैठकही पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार गतवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता गृहित धरून नियोजन सुरू करण्यात आले आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता पंचगंगा नदीच्या काठावरील 380 पूरबाधित क्षेत्रातील गावांवर यंदाही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या गावांनी आगामी काळात कोणत्या प्रकारे दक्षता घ्यायची या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
धरणे 90 भरली की पूरबाधित गावांना करणार रिकामे
पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणे 90 टक्के भरल्यानंतर पूरबाधित क्षेत्रातील गावातील नागरिकांना शेल्टर होमसारख्या निवारा केंद्रात हलविण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजनही गावानुसार करण्याचे काम सध्या सुरू आहे. गतवर्षी पंचगंगा नदीच्या पाण्याने तब्बल 43 फूट पातळी गाठली होती. आजवरच्या महापुराच्या इतिहासातील हा विक्रम होता. यंदा 43 फूट पातळी गृहित धरून नियोजन सुरू करण्यात आले आहे. या पातळीमुळे ज्या गावात महापुराचे पाणी शिरले होते. त्या गावांना आतापासूनच उपाययोजना आणि संभाव्य स्थितीबाबत दक्ष करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून ग्रामपंचायतींना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
आपत्तीव्यवस्थापन विभाग अतिदक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रसाद संकपाळ या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱयांबरोबर 35 जणांचा चमू आहे. वर्षभर हा चमू दररोज तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतो. गतवर्षी महापुरात या चमूने बचावकार्यात मोलाची भूमिका पारप पाडली होती. त्यामुळे मनुष्यहानी टळली होती. यंदाही या विभागाने आपले काम पावसाळय़ापूर्वीच सुरू केले आहे. बोटीची दुरूस्ती देखभाल करून चाचणीही घेण्यात येत आहे. इमर्जन्सी लाईटचीही सज्जता ठेवण्यात आहे. चमूतील सहकाऱयांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या चमूतील सहकारी कोरोनाविरूद्धच्या लढय़ातही मदत करत आहेत.
रेडझोनमधील भागावरही लक्ष
कोल्हापूर शहरातील रेडझोनमधील भागात गतवर्षी महापुराचे पाणी घुसले होते. त्यावरही जिल्हा प्रशासनाची नजर आहे. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी संभाव्य स्थितीबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
चिखली, आंबेवाडी ग्रामपंचयतींना सूचना
प्रयाग चिखली आणि आंबेवाडीला गतवर्षी महापुराने वेढले होते. या ठिकाणच्या नागरिकांनाचे सोनतळी, रजपूरवाडी येथे पुनरर्वसन करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक चिखली, आंबेवाडीत राहत आहेत. त्यांना त्यांच्या दिलेल्या जागेत जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचना या गावांच्या ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
संभाव्य पूरस्थितीच्या बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. जिल्हाप्रशसनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. पूरबाधित गावांत पूरस्थिती निर्माण होण्याआधी प्रबोधन, जागृती केली जाईल. त्यानंतर गावातील नागरिकांना आवश्यकतेनुसार निवारा केंद्रात पाठविले जाईल. -प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी