वार्ताहर/ साखरपा
महाराष्ट्रात दुष्काळी भागातील शेतकऱयांसाठी लोकप्रिय अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनच्या कामाची व्याप्ती आता कोकणपर्यंत वाढत आहे. नाम फाऊंडेशनच्या सौजन्याने कोंडगाव (साखरपा) काजळी नदीतील गाळ उपसा आणि नदी रुंदीकरणाचा शुभारंभ सोमवारी झाला. या प्रकल्पामुळे साखरपा बाजारपेठेची पुराच्या पाण्यापासून मुक्तता होणार आहे.
कोंडगाव जुना एस टी स्टँडनजीकच्या विठ्ठल मंदिर येथे हा कार्यक्रम श्री दत्त देवस्थान कोंडगाव, कोंडगाव ग्रामपंचायत आणि दत्त सेवा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. विधिवत पूजन आणि श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मुख्य अतिथी म्हणून नाम फाऊंडेशनचे समन्वयक नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, विश्वस्त माजी अप्पर जिल्हाधिकारी इंद्रजित देशमुख, महाराष्ट्र समन्वयक गणेश थोरात, कोकण समन्वयक समीर जानवलकर, भगवतसिंह चुंडावत आदी उपस्थित होते. मुग्धा सरदेशपांडे यांनी ईशस्तवन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी कोंडगाव पंचायत समिती सदस्य जया माने, गावचे सरपंच बापू शेटय़े, व्यापारी संघटना अध्यक्ष आणि दत्त सेवा पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर, संजय गांधी, सुरेश गांधी, बापू शिंदे, शेखर आकटे, बापू लोटणकर, गिरीश सरदेशपांडे, प्रताप सावंत, अमित केतकर, राजेश पत्याणे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नदीतील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल तसेच पुराचे पाणी बाजारात शिरण्याचा धोकाही टळेल अशी अपेक्षा श्रीधर कबनुरकर, प. समिती सदस्य जया माने, सरपंच बापू शेटय़े यांनी आपल्या मनोगातून व्यक्त केली. मुख्य अतिथी इंद्रजित देशमुख आणि मल्हार पाटेकर यांनी नाम फाऊंडेशन कोंडगावमधील उपक्रमांना कायम सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.