पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली होणार चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटक आणि हैदराबाद-कर्नाटक भागात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. बेळगाव जिल्हय़ातही पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी मालमत्ता व पिकांची हानी झाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव जिल्हय़ातही पावसामुळे झालेल्या हानीसंबंधी अलिकडेच अधिकाऱयांकडून अहवाल मागविला आहे. शुक्रवारी बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. गुलबर्गा जिल्हय़ातही अधिक पाऊस झाला असून तेथे पाहणीसाठी अधिकाऱयांचे पथक पाठविले आहे. अहवाल आल्यानंतर मदतीबाबत उपाययोजना केल्या जातील. हुक्केरीलाही अलिकडेच अधिकाऱयांनी भेट दिली आहे. त्यांच्याकडूनही पूर आणि नुकसानीची आकडेवारी जाणून घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात पुन्हा पावासाने जोर धरला आहे. परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी पूर आला आहे. पुरामध्ये अडकलेल्यांचे रक्षण आणि मदतकार्य हाती घेण्यासंदर्भात अधिकाऱयांना बैठकीत सूचना दिल्या जातील. आलमट्टी जलाशयातूनही पाण्याचा विसर्ग करण्याची व्यवस्था केली आहे. नारायणपूर जलाशयातून 1.5 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांमध्ये पाऊस होत आहे. त्यामुळे तेथून वाहून येणाऱया पाण्यासंदर्भात तेथील अधिकाऱयांकडून प्रत्येक तासाला माहिती घेतली जात आहे. दरम्यान, तहसिलदार, पोलीस अधिकाऱयांमार्फत नागरिकांमध्ये सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.