प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायतीला यापुढे सर्व अधिकार देण्यात येतील तसेच निधीही वाढवून देणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही जिल्हा पंचायत सदस्यास काम नाही, अशी परिस्थिती येणार नाही, तसेच त्यांच्याकडून कोणत्याही तक्रारीस जागा ठेवणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. यापुढे स्वंयपूर्ण गोवा आणि ग्रामीण भागांचा विकास यावर सरकारचा पूर्ण भर असेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत भरघोस मतांद्वारे भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर हर्षोल्हासित झालेल्या भाजपने पत्रकार परिषदेतून आनंद व्यक्त केला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर त्यावेळी उपस्थित होते.
काम नाही, अधिकार नाही, अशा तक्रारी राहणार नाही
स्वंयपूर्ण गोवा संकल्पनेखाली यापुढे जिल्हा पंचायत सदस्यांना काम करण्यास भरपूर वाव मिळणार आहे. सरकार यापुढे ग्रामीण विकासावर जास्त भर देणार आहे. त्यात जिल्हा पंचायत सदस्यांना सहभागी करून घेण्यात येईल, त्यामुळे भविष्यात कोणताही जि. पं. सदस्य आपणास काम नाही, अधिकार नाही, यासारख्या तक्रारी करणार नाही. किंबहुना भरपूर काम करून स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांनी सरकारची बदनामी, अपशकून केले
विरोधकांकडून विविध माध्यमांद्वारे सरकारची बदनामी आणि अपशकून करण्याचे प्रयत्न होऊनसुद्धा गोमंतकीय जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. तमनार प्रकल्प, रेल्वे डबल ट्रेकिंग, आयआयटी यासारख्या अनेक विषयांवर राज्यात आंदोलने चालू आहेत, मात्र त्यांचा कोणताही परिणाम निवडणुकीतून दिसून आला नाही. त्यातून 85 टक्के उमेदवार विजयी होऊन भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. यावरून गोमंतकीयांचा भाजप आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार याची आम्हाला पूर्ण खात्री होती. मतदारांनी ती सत्य ठरविली आहे. हेच चित्र येत्या विधानसभा निवडणुकीतही असेल व भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असेही ते म्हणाले.
मडकईतला जाणता राजा सल्ले देतच राहिला : तानावडे
या निवडणुकीत काँग्रेसची दयनीय स्थिती झाली आहे. दोन्ही जि. पं. मतदारसंघांत आपलेच अध्यक्ष असतील अशी शेखी मिरविणाऱया काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. मडकईचा ज्येष्ठ राजकारणी ज्याला आम्ही जाणता राजा म्हणतो, त्याने सरकारला केवळ सल्ले आणि उपदेश देण्यातच वेळ घालवला. परिणामी त्याला उत्तरेत खातेसुद्धा खोलता आले नाही व दक्षिणेत इन-मीन-तीनच जागा मिळविता आल्या. गोंय आणि गोंयकारपणाचा टेंभा मारणाऱया प्नाक्षाला तर मतदारांनी पूर्ण झिडकारले आहे, अशी टीका तानावडे यांनी केली.
बहिष्कार हा उपाय ठरू शकत नाही
उत्तर आणि दक्षिणेत दोन ठिकाणी मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्यासंबंधी विचारले असता, निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने प्रश्न सुटत नाहीत. घटनेने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. आपले प्रश्न, समस्या या त्या त्या माध्यमातून सोडविता येतात. त्यासाठी बहिष्कार हा उपाय ठरू शकत नाही. त्या लोकांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, असेही तानावडे म्हणाले.
विद्यमान सरकारसाठी ही सेमी फायनल असल्याचे लोक बोलत होते, परंतु आम्ही मात्र प्रत्येक निवडणुकीकडे फायनल या दृष्टीनेच पाहतो आणि तसे कामही करतो. भाजपचे अनेक उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर काही उमेदवार केवळ 23 सारख्या अल्प मतांनी हरलेले आहेत. अशावेळी जिंकलो, हरलो यातील मतांचा फरक मोजत बसण्यापेक्षा दोन्ही ठिकाणी आमचा विजयच झाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे कोणताही भेदभाव न ठेवता हे सरकार सर्वांना एकसमान न्याय देताना ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे सांगितले.
आयआयटी मेळावलीतच होणार : विश्वजित
मेळावलीत आयआयटीसाठी आंदोलन चालू असतानाही वाळपईत भाजपला 100 टक्के विजय प्राप्त झाला. त्यावरून प्रत्यक्षात तेथे विरोध हा नाहीच हेच सिद्ध होते, असे श्री. राणे यांनी सांगितले. त्यामुळेच आयआयटी मेळावलीत होणारच या आपल्या मताचा त्यांनी पुनरुच्चार केला. सत्तरीच्या विकासासाठी आयआयटी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या उमेदवारांना डिपॉझिट बाबू कवळेकर
काँग्रेस सोडून आम्ही दहाजण भाजपात आलो त्यावेळी मनात मोठी रुखरूख होती, भीती होती. परंतु आम्ही लोकसेवेत कोणताही खंड पडू न देता कार्यरत राहिलो व त्याचा परिणाम म्हणून जनतेने आमच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी केले. यावरून लोकांनी आम्हाला स्वीकारलेले आहे, हेच सिद्ध होते, असे मत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी व्यक्त केले. याऊलट काँग्रेसच्या काही उमेदवारांना स्वतःची अनामत रक्कमही वाचवता आली नाही, एवढी त्यांची दयनीय स्थिती झाली आहे, अशी टीका कवळेकर यांनी केली.