काकती येथील कामगारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊननंतर काही दिवस कारखाना बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा लगेच कारखाना सुरू करण्यात आला. मात्र अचानक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर नोटीस लावून कारखाना बंद करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहे. 24 मार्चपासून काम केलेले वेतनही देण्यात आले नाही. तेव्हा बालु इंडिया वर्कशॉप-काकती या कारखान्याच्या मालकावर कारवाई करावी, याचबरोबर आम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी कारखान्यातील कामगारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे बंद पडले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना वेतन द्या, असे सांगितले होते. असे असताना काम करूनदेखील आम्हाला वेतन दिले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास आम्ही 160 कामगार आहोत. असे असताना अचानकपणे कारखाना बंद करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना न देता हा कारखाना बंद केला आहे. आम्हाला परवडत नाही, असे सांगून मालकाने आमची फसवणूक केली असून आम्हाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बालु इंडिया एम्प्लॉय युनियनचे अध्यक्ष मारुती अष्टेकर, उपाध्यक्ष मनोहर पाटील, धाकलु हिरोजी, भरमा गुंडलकुप्पी, प्रशांत अकनोजी, सिद्राय मोतगेकर, प्रकाश खांडेकर, कल्लाप्पा मिरजकर, बाळाप्पा धुळाप्पगोळ यांच्यासह 100 हून अधिक कामगार उपस्थित होते..