काँग्रेस आणखी आक्रमक होण्याची शक्यता, भाजपचीही तयारी : उत्तर कर्नाटकातील मुद्दय़ांवर म्हणावी तशी चर्चा झालीच नाही
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उत्तरार्ध सोमवार दि. 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध वेगवेगळय़ा विषयांमुळे वादळी ठरणार आहे. राज्य सरकार अतिवृष्टीवरील चर्चेला विधानसभेत सोमवारी उत्तर देणार आहे. मंत्री भैरती बसवराज यांच्यावर फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. सभाध्यक्षांनी या मुद्दय़ावर चर्चेला अनुमती दिली नाही म्हणून काँग्रेसने धरणे धरले आहे.
सोमवारी काँग्रेसने मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तोडगा निघाला नाही तर काँग्रेस आणखी आक्रमक होण्याची शक्मयता आहे. विधानपरिषद निवडणूक निकालानंतर दोन्ही सभागृहात वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. विरोधकांना जशास तसे भिडण्याचे भाजपने ठरविले आहे. त्यामुळे सोमवारपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वादंग, गदारोळ माजण्याचीच शक्मयता अधिक आहे.
उत्तर कर्नाटकातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव येथे विधिमंडळाचे अधिवेशन भरविण्यात येत आहे. प्रत्यक्षात उत्तर कर्नाटकातील मुद्दय़ांवर म्हणावी तशी चर्चा झाली नाही. गेला आठवडाभर अतिवृष्टी, त्यामुळे झालेली पीकहानी, घरांची पडझड, आर्थिक नुकसान यावर बरीच चर्चा झाली आहे. शुक्रवारी सरकार उत्तर देणार होते. मात्र, भैरती बसवराज यांच्या मुद्दय़ावर काँग्रेसच्या आमदारांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे धरल्याने सोमवारी चर्चेवर उत्तर देणार असल्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी जाहीर केले आहे.
गदारोळ वाढण्याची शक्यता
सोमवारी विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या धरण्यावर तोडगा निघाला नाही तर गदारोळ वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सभागृहात अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देण्याऐवजी ते मांडण्याची शक्मयता आहे. उत्तरार्धात तरी उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी काही महत्त्वाची विधेयके व इतर विषय लक्षात घेता उत्तरार्धातही चर्चा होईल, याची शक्मयता धूसर आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विधान सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील हे उत्तर कर्नाटकातील आहेत. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे मूळचे दक्षिणेतले असले तरी उत्तर कर्नाटकातील बदामीचे आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच तेही उत्तर कर्नाटकातीलच आहेत. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकावरील चर्चेवर भर देणार, अशी अपेक्षा होती. पूर्वार्धात तरी ती फोल ठरली आहे.
माजी मुख्यमंत्री व निजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या पुढाकारामुळे बेळगावला अधिवेशन झाले. पूर्वार्धात एक दिवसही त्यांनी कामकाजात भाग घेतला नाही. किमान उत्तरार्धात तरी कुमारस्वामी सहभागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदर घडामोडी लक्षात घेता उत्तरार्ध वादळी ठरणार, याची लक्षणे दिसू लागली आहेत.