बेळगावसह विविध जिल्हाधिकाऱयांशी मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
मागील आठवडाभरापासून राज्यात पावसाची रिपरिप सुरूच असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बेळगावसह विविध जिल्हय़ांमधील पाऊस आणि नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पीक नुकसान भरपाई, पूर नियंत्रण व इतर विषयांवर चर्चा करून त्वरित उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना केल्या आहेत.
कोडगू, हासन, बळ्ळारी, उडुपी, शिमोगा, कारवार, चिक्कमंगळूर, विजापूर, गुलबर्गा, म्हैसूर कोप्पळ आणि बेळगाव जिल्हय़ांमध्ये मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे या जिल्हय़ांमध्ये नुकसान भरपाई आणि मदतकार्य तातडीने हाती घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिली आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी अत्याधुनिक साधने खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल. जिल्हाधिकाऱयांच्या खात्यात उपलब्ध असणाऱया निधीचा वापर पूरस्थिती नियंत्रणाच्या कामांसाठी करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली.
भूस्खलन होणाऱया ठिकाणांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमावीत. या भागातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पीक नुकसानीबाबत सर्वेक्षण करून तातडीने शेतकऱयांना भरपाई द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केल्या आहेत.