सचिन ठाणेकर / सांगली
सांगलीतील पूर पट्ट्यात बफर झोन मध्ये असलेल्या दोन हजार कच्च्या घरांच्या पुनर्वसनासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सांगलीत येऊन आढावा घेतला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून त्यांनी खुल्या जागेची माहिती घेतली.
२०१९ मधील पूरपरिस्थितीचे ड्रोनद्वारे केलेल्या चित्रीकरणानुसार पाणी कोठे किती पातळीला येते हे पाहून लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान टाळता आले आहे. नागरिक आणि व्यापारी पेठेचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पंचनामे तातडीने केले जातील आणि त्यानुसार नुकसान भरपाईचे धोरण शासन जाहीर करेल असे मंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
९ एकर जागेवर पुनर्वसन?
पूर पट्ट्यातील सातत्याने पाण्याखाली जाणाऱ्या भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सांगली मिरज रस्त्यालगत असलेल्या एका ९ एकर जागेबाबत यावेळी नकाशा पुढे ठेवून मंत्र्यांना माहिती देण्यात आली. २ हजार कच्च्या घरांचे पुनर्वसन या ठिकाणी होऊ शकेल काय याबाबत विचार करू असे मंत्री म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक नेते जितेश कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.