बेंगलोर येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक : अलमट्टी मधील पाणी साठवणूक,सोडण्याबाबत चर्चा
प्रतिनिधी / इस्लामपूर
पूर काळात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने बेंगलोर येथे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत बैठक झाली. दरम्यान दोन्ही राज्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाली असून पूर नियंत्रण व कृष्णा-भीमा नदी संदर्भात पूर नियंत्रण कसे करावे आणि दोन्ही राज्यांनी समन्वय कसा ठेवायचा याबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा करण्यात आली.
पाटील पुढे म्हणाले, यावेळच्या पावसाळ्यात संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी कुठून किती पाणी सोडावे, धरणातील पाणी पातळी किती ठेवावी, अलमट्टी धरणातील डायनॅमिकेली पाणी पातळी कशी नियंत्रित करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये आणखी सुधारणा होत जाईल. ही बैठक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचा समन्वय ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील सचिव श्रविजय कुमार गौतम,ए.पी कोहीरकर, सहसचिवए. ए. कपोले,मुख्य अभियंताहणमंत गुणाले,अधीक्षक अभियंता मिलींद नाईक उपस्थित होते.तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई,मुख्य सचिव, राकेश सिंग,प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद,मुख्य सल्लागार, अनिल कुमार,जलसंपदा विभागाचे सचिव लक्ष्मणराव पेशवे,कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन गुंगे हे उपस्थित होते.