रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील सर्व पूलांचे आयुर्मान आणि त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी धोरण निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली असून यात देशातील सर्व पूलांची माहिती एकत्रित करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. वैभव डांगे आणि सच्चिदानंद जोशी यांनी लिहिलेले पुस्तक ‘बिल्डिंग ब्रिजेस-शेपिंग द फ्यूचर’चे बुधवारी दिल्लीत प्रकाशन करताना ते बोलत होते.
समुद्रकिनारी उभारल्या जाणाऱया पूलांमध्ये स्टेनलेस स्टीलच्या वापरावरून मंथन केले जात आहे. यामुळे पूलांची शक्ती आणि वय वाढण्यासह त्यांना अधिक सुरक्षित करण्यासही मदत मिळणार असल्याचे गडकरी म्हणाले.
नागपूरमध्ये एक रेल्वे पूल होता. इंग्रजांच्या काळात लंडनमधून या पूलाचे वय किती आहे, त्याच्या दुरुस्तीची कधी गरज आहे याचा संदेश यायचा, त्यानुसार दुरुस्ती केली जात होती. परंतु आमच्या देशात अशी व्यवस्था नाही. कुठलाही पुढाकार घेणे किंवा त्याची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतो हे यामागील कारण असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब
वैभव डांगे आणि सच्चिदानंद जोशी यांच्या पुस्तकामुळे पूल अधिक उत्तमप्रकारे निर्माण करण्यासाठी अनेक पर्याय समोर येतील. पूलांच्या स्पॅनला जोडण्यात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. आमच्याकडे 30 मीटरचा स्पॅन असतो. मलेशियात 45 मीटरचा स्पॅन असतो, यामुळे पूलाच्या निर्मितीखर्चात 30 ते 40 टक्क्यांची घट होत असल्याचे गडकरी यांनी नमूद केले आहे.
बहुमजली रस्ते
शहरांमध्ये तीन किंवा चारमजली रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. शहरांमध्ये भूमी अधिग्रहण अवघड असते. नागपूरमध्ये दोनमजली रस्त्यांवरून मेट्रो धावत आहे. अशाचप्रकारे पुण्यात चारमजली रस्तेप्रकल्पाची तयारी आहे. परंतु असे करताना पूलांची स्थिती आणि आयुर्मानाबद्दल विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
सुरक्षा वाढणार
इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टीममध्ये 1 लाख 27 हजारांहून अधिक ब्रिज आणि त्यांची माहिती आहे. यामुळे कुठल्या पूलाला कधी दुरुस्तीची गरज आहे हे आगामी काळात एका क्लिकवर समजू शकणार आहे. तसेच कुठला पूल नव्याने उभारण्याची गरज आहे हे वेळीच लक्षात येणार आहे. स्वतःच्या क्षमतेहून अधिक वाहनांचा भार सहन करत असलेल्या पूलांचीही माहिती समोर येणार आहे. या माहितीमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन सुरक्षित करण्यास यश मिळणार आहे.