मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्धार : आज बँकिंग क्षेत्राची बैठक : गोव्यातील रेल्वे थांबा बंद करण्याची केंद्राकडे मागणी
प्रतिनिधी / पणजी
गोव्याला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा फायदा घेतला जाणार आहे. त्यासाठी आज शुक्रवारी 15 मे रोजी राज्यस्तरीय बँकिंग क्षेत्राची बैठक सायंकाळी 4 वाजता बोलाविण्यात आली आहे. या पॅकेजचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. वित्तमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण देश या व्याख्येला स्वदेशी पद्धतीने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. गोवा सरकारच्यावतीने आपण याचे स्वागत करतो. साधनसुविधा निर्मिती, गृहबांधणी तसेच स्थानिक विकास यासाठी या पॅकेजचा मोठा फायदा गोव्याला होणार आहे.
पंचायती स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न
अर्थव्यवस्था मजबुतीसाठीही पॅकेजचा फायदा होणार आहे. कोणकोणत्या क्षेत्रासाठी या पॅकेजचा वापर करून घेता येईल याचा सरकार विचार करणार आहे. गोवा स्वयंपूर्ण व्हावा तसेच पंचायतींनाही स्वयंपूर्ण बनविता यावे यासाठी सरकारचे प्रयत्न याअगोदरच सुरू झाले आहेत. गोवा अन्य राज्यांवर अवलंबून राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आज 15 रोजी बँकिंग क्षेत्राची बैठक
आज 15 रोजी सायंकाळी 4 वाजता होणाऱया राज्यस्तरीय बँकिंग क्षेत्राच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वित्त सचिव तसेच बँकांच्या प्रतिनिधींची उपस्थिती असेल. पॅकेज कशा पद्धतीचे आहे व गोव्यासाठी कोणत्या क्षेत्रात कसा फायदा घेता येईल यावर चर्चा होणार आहे. केवळ राष्ट्रीयकृत बँकाच नव्हे तर अन्य बँकांमार्फतही प्रयत्न केले जाणार आहेत. उत्पादन क्षेत्रासाठी कसा फायदा मिळवायचा, कृषी क्षेत्रासाठी कसा फायदा मिळवायचा, त्याचबरोबर अन्य प्रकल्पासाठी कसा लाभ घेता येईल यावर चर्चा होणार आहे.
हमीविना कर्ज पुरवठय़ासाठी प्रयत्न करणार
हमीविना कर्ज पुरवठा करावा असे केंद्र सरकारने सूचित केले आहे. त्यासाठीही गोवा सरकार प्रयत्न करणार आहे. 200 कोटीपर्यंतच्या जागतिक निविदांबाबतही केंद्र सरकारने घोषणा केली आहे. गोव्यातील कंत्राटदारांना त्याचा फायदा मिळावा यासाठीही सरकारचा प्रयत्न आहे. साधनसुविधा विकास महामंडळ, साबांखा तसेच जलस्रोत खात्यामार्फत या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. रेरा कायद्याखाली येणारे प्रकल्प व अन्य प्रकल्पांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे व तो निर्णय स्वागतार्ह आहे.
गोव्यात येण्यासाठी हजारो गोमंतकीयांचे अर्ज
आवश्यकता नसल्यास गोव्यातील रेल्वेचा थांबा बंद करावा, अशी मागणी केंद सरकारकडे केली आहे. बाहेरून येणारे बिगरगोमंतकीय प्रवासी गोव्यासाठी त्रासदायक ठरू शकतील. नुकत्याच आलेल्या रेल्वेतून 17 लोक आले आहेत. गोव्यातील मजूर जसे बाहेर जातात तसेच गोव्यातही बाहेरून लोक येऊ पाहतात. 6200 जणांनी गोव्यात येण्यासाठी परवानगी मागितली आहे, तर विदेशातून 8211 गोमंतकीय येऊ पाहत आहेत. सध्या डी. जी. शिपिंगकडे 3842 जणांची नोंद आहे. शेजारील राज्यात येणाऱया विमानातून यायची तयारी असल्यास त्यांनी यावे. काही दिवसानंतर गोव्यातही विमाने येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मान्यतेशिवाय गोव्यात येऊ नये
वेगवेगळय़ा मार्गाने लोक गोव्यात येत आहेत. त्यांनी मान्यता न घेता व चाचणी न करता गोव्यात येऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. आजपर्यंत 6200 पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काहींचा अहवाल सकारात्मक आला. जे गोमंतकीय आहेत त्यांनाच गोव्यात प्रवेश दिला जाणार आहे, मात्र गोव्यात येताच त्यांची चाचणी केली जाईल व त्यांना कोरंटाईन करण्यात येईल.
अफवा पसरविणाऱयांवर कारवाई
कोरोनाबाबत सोशल मीडीयावरून व अन्य प्रकारे वेगवेगळय़ा अफवा पसरविल्या जात आहेत. लोकांनी अशा अफवा पसरवू नयेत. नपेक्षा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्याचबरोबर सोलापूरवरून आलेल्या 6 कोरोनाबाधित रुग्णांची नावे गोमेकॉतून बाहेर आली. मेडीकल पॅथोलॅब कर्मचाऱयांना सूचना करतो की अशी चूक त्यांनी पुन्हा करू नये. नावे बाहेर कशी आली याची चौकशी सुरू झाली आहे. ज्याने ही कृती केली त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
धान्य-अत्त्यावश्यक वाहतुकीवर निर्बंध येणार नाहीत
गोव्यात जी धान्य पुरवठय़ासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक केली जाते त्यावर निर्बंध घालण्यात येणार नाही. कारण धान्यपुरवठा बंद झाल्यास त्याचा गोव्यालाच त्रास होईल, मात्र गोव्याच्या चेकनाक्यावर त्यांची तपासणी केली जाणार आहे. धान्याची वाहने येतात त्यांना बारा तास थांबावे लागते. त्यांनी थोडी कळ सोसावी. कारण सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जी रेल्वे यानंतर गोव्यात येणार आहे त्यामध्ये 720 प्रवाशांनी बुकिंग केले आहे, मात्र त्यात थोडेच गोमंतकीय आहेत. गोव्यातील समुद्रकिनारेही बंद करण्यात आले आहेत. कोविड फंडाचा वापर मदतीसाठीच केला जात आहे. या निधीच्या वापरात 100 टक्के पारदर्शकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इयत्ता दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
गोव्यात एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर त्यांच्या गाडीच्या चालकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी एक लहान मुल आहे. तसेच गुजरात येथून आलेला एक ट्रकचालकही कोरोनाबाधित आहे. मुंबईतून गोव्यात दाखल झालेला एक खलाशीही कोरोनाचा रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत खलाशाची चाचणी नकारात्मक आली होती, पण गोव्यात चाचणी करताच त्याला कोरोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रुग्ण बरे होतील, अशी आशा आहे मात्र हे सर्व रुग्ण बाहेरून आलेले आहेत, असेही ते म्हणाले.