रत्नागिरी \ ऑनलाईन टीम
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पॅकेज’वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी पॅकेजची घोषणा कधीपर्यंत करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘पॅकेज’वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही. सरकार वादळग्रस्त भागातील जनतेसोबत आहे. विरोधकांना उत्तर द्यायला मी इथे आलो नाही. कोकणातील जनतेला दिलासा देण्यासाठी आलो आहे. हेलिकॉप्टरमधून पाहणी करून नाही गेलो. लोकांना भेटायला आलो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. इथल्या विरोधी पक्षसारखे बोलणार नाही. माझा पंतप्रधानांवर विश्वास आहे. ते लवकरच महाराष्ट्रासाठी देखील मदत जाहीर करतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत लगेचच सुरू करू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलण्यावर अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत ९० ते ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ. तसेच माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.