नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये ऐतिहासिक यश संपादन करणाऱया भारतीय संघातील शेवटचे पथक मायदेशी दाखल झाले त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले गेले. नेमबाजीतील सन्सेशन अवनी लेखरा व शटलर-कम-ब्युरोक्रॅट सुहास यथिराज यांचा या पथकात प्रामुख्याने समावेश राहिला. नवी दिल्ली विमानतळावर क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी, पॅरा ऍथलिट्सचे कुटुंबिय, चाहते मोठय़ा प्रमाणात हजर राहिले.
भारताच्या शेवटच्या पथकात बॅडमिंटन, नेमबाजी व रिकर्व्ह तिरंदाजी पॅरा ऍथलिट्सचा समावेश राहिला. सुवर्ण व कांस्य जिंकणारी 19 वर्षीय लेखरा, सुवर्णजेते शटलर्स प्रमोद भगत, कृष्णा नागर, रौप्यजेता यथिराज, कांस्यजेता मनोज सरकार, नेमबाज सिंहराज, मनीष नरवाल यांचे यावेळी आगमन झाले. हरयाणा क्रीडा मंत्री व माजी हॉकीपटू संदीप सिंग तसेच भारतीय पॅरालिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी या सर्वांचे स्वागत केले.
प्रारंभी, सकाळच्या सत्रात रौप्यजेती टेबलटेनिसपटू भाविनाबेन पटेल अन्य ऍथलिट व पदाधिकाऱयांसह मायदेशी दाखल झाली. टोकियोहून परतलेले सर्व पॅरा ऍथलिट्स गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.