ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पॅलेस्टाईनच्या रामल्लाह येथील दूतावासात भारताचं प्रतिनिधीत्व करणारे राजदूत मुकूल आर्य यांचा मृतदेह आढळून आला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री डॉ. रियाल अल मलिकी यांनी आर्य यांच्या निधनावर भारताचे समकक्ष एस जयशंकर यांच्याशी संवाद साधून शोक व्यक्त केला. तसेच शोकाकूल कुटुंबीयांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. त्यानंतर एस जयशंकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ”रामल्लाहमध्ये भारताचे प्रतिनिधी मुकूल आर्य यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर स्तब्ध आहे. ते एक प्रतिभावंत अधिकारी होते. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुकूल आर्य यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. आर्य हे 2008 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी होते. त्यांनी काबूल, मॉस्को येथील भारतीय दूतावास तसेच दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातही काम केले होते. पॅरिसमधील युनेस्कोमध्येही भारताच्या स्थायी प्रतिनिधीमंडळात त्यांना कामाचा अनुभव होता. भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्यापूर्वी आर्य यांनी दिल्ली विद्यापीठ (डीयू) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अर्थशास्त्रातून पदवी घेतली होती.