नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सादर करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या गुरुवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशीकुमार यांच्यासह अनेकांनी या याचिका सादर केल्या आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली जावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामाना आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. सर्व याचिकांची एकत्र सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. ही कथित हेरगिरी केंद्र सरकार किंवा त्याच्या कोणत्याही संस्थेने केली आहे काय, हे स्पष्ट करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा, अशी मागणीही या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.
एम. एल. शर्मा आणि जॉन ब्रिटास या दोन वकीलांनीही याचिका सादर केल्या आहेत. शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी न्यायालय नियंत्रित विशेष अन्वेषण दलाकडून (कोर्ट मॉनिटर्ड एसआयटी) केली जावी, अशी मागणी केली आहे. अशी हेरगिरी घटनाबाहय़ असून ती विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
ही कथित हेरगिरी भारतातील काही राजकीय नेते, काही मान्यवर पत्रकार, विचारवंत आणि इतर नागरीकांविरोधात करण्यात आली असा आरोप आहे. हे कथित प्रकरण साधारणतः एक महिन्यापूर्वी बाहेर आले होते. त्यानंतर भारतात बराच गदारोळ झाला होता. तसेच संसदेचे कामकाज दोन आठवडे प्रभावित झाले होते. विरोधकांनी या प्रकरणाच्या उच्च पातळीवरील चौकशीची मागणी केली आहे.