पश्चिम बंगालच्या ममता सरकारचा निर्णय – 5 दिवसांच्या दिल्ली दौऱयावर मुख्यमंत्री
वृत्तसंस्था/ कोलकाता
इस्रायली सॉफ्टवेअर पेगॅससद्वारे हेरगिरी झाल्याच्या कथित आरोपाप्रकरणाची चौकशी पश्चिम बंगाल सरकारकडून नियुक्त आयोग करणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी हेरगिरीप्रकरणी चौकशी करणाऱया आयोगाची घोषणा केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन भीमराव आणि माजी मुख्य न्यायाधीश ज्योतिर्मय भट्टाचार्य यांचा या आयोगात समावेश आहे.
हेरगिरी प्रकरणी चौकशी करणारे बंगाल पहिले राज्य ठरले आहे. याप्रकरणी केंद्र सरकार कठोर कारवाई करेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत तपास होईल अशी अपेक्षा होती. पण असे घडले नाही. इस्रायली सॉफ्टवेअरद्वारे नागरिकांपासून न्यायपालिकेपर्यंत पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार
ममता बॅनर्जी सोमवारी 5 दिवसीय दौऱयानिमित्त दिल्लीत पोहोचल्या आहेत. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना त्या भेटणार आहेत. भाजपविरोधीत शक्तिशाली आघाडी तयार करण्याचा प्रयत्न याद्वारे होत असल्याचे मानले जात आहे. 27 मे रोजी ममता बॅनर्जी संसद भवनात जाऊ शकतात. त्याच दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्या भेट घेऊ शकतात. 28 मे रोजी दुपारी 3 वाजता ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित करत चर्चा करू शकतात. ही बैठक त्यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे समजते.
सोनिया गांधींशी चर्चा
स्वतःच्या दिल्ली दौऱयादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. पण या भेटीची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित नाही.
मोदी-ममता भेट
मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या बंगाल निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी आणि मोदी पहिल्यांदाच भेटणार आहेत. पेगॅसस हेरगिरीचा वाद आणि प्रसारमाध्यमांवरील छापे यासारख्या मुद्दय़ांवरून केंद्र सरकारवर तृणमूल काँग्रेसने शाब्दिक हल्ले चालविले असताना ही भेट होणार आहे.
विरोधकांची एकजूट ?
ममतांच्या दिल्ली दौऱयाकडे राष्ट्रीय राजधानीतील स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न म्हणून पाहण्यात येत आहे. विखुरले गेलेल्या विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकजूट करण्याच्या हालचाली ममतांनी चालविल्या आहेत. ममतांनी मागील आठवडय़ात उत्तरप्रदेश, दिल्ली आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये व्हर्च्युअल सभा घेतली होती. या सभेद्वारे ममतांनी बंगाल निवडणुकीतील विजयानंतर त्यांची नजर आता राष्ट्रीय राजकारणावर असल्याचे स्पष्ट केले आहे.