शेतकऱयांच्या मुद्दय़ांवरही विरोधकांकडून गदारोळ
वृत्तसंस्था /चंदीगढ
कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून शुक्रवारी पुन्हा एकदा संसदेत प्रचंड गेंधळ घातला गेला. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सदनांमध्ये विरोध पक्ष सदस्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सकाळी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभाध्यक्षांच्या आसनानजिक धाव घेऊन तेथे ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
कामकाज सुरु होताच लोकसभेत प्रथम भारताच्या ऑलम्पिक संघाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्वरित गदारोळाला प्रारंभ झाला.
तृणमुलचा आरोप
हेरगिरी करण्यासाठी भारत सरकारने कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. त्याचा हिशोब सदनासमोर ठेवावा, अशी मागणी या सदस्यांनी केली. तर काँग्रेसने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली. तर शिरोमणी अकाली दलाच्या सदस्यांनी नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. याचवेळी जासूसी करणा बंद करो, अशा घोषणा विरोधी सदस्यांनी दिल्या.
लोकसभा अध्यक्षांचे प्रयत्न
सदनातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला. सदस्यांनी आपल्या असनाभोवती गर्दी करू नये, त्यांनी कोरोना नियमावलीचे भान राखावे, प्रत्येक पक्षाला बोलण्याची संधी देण्यात येईल, कोणत्याही विषयावर सदनात चर्चा करण्याची अनुमती दिली जाईल, मात्र सदस्यांनी गोंधळ करून सदनाचा वेळ वाया घालवू नये, असे आवाहन त्यांनी केले.