राहुल गांधींनी बोलाविली नेत्यांची बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन पुन्हा संसदेत गदारोळ झाल्याने दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करावे लागले आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांनी पेगॅसस प्रमाणे कृषी कायदे आणि इतर काही मुद्दय़ांवरुन घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सदनांच्या अध्यक्षांना अनेकदा कामकाज बंद करावे लागले. अखेर दुपारनंतर कामकाज मंगळवारपर्यंत पुढे ढकलल्याची घोषणा करण्यात आली.
काँगेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांचे पुढील धोरण ठरविण्यासाठी आज मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. संसदेच्या या सत्राच्या उरलेल्या काळात कोणती भूमिका घ्यायची यावर या बैठकीत विचार होणार असल्याचे सांगण्यग्नात आले. विरोधी पक्षांनी सरकारला एकत्रितरित्या घेरण्यासाठी या बैठकीचा उपयोग होईल, असे काँगेसचे म्हणणे आहे.
लवाद नियम सुधारणा विधेयक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवाद नियम सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले आहे. विविध कायद्यांतर्गत असणारे लवाद रद्द करण्याची तरतूद या विधेयकात आहे. न्यायव्यवस्था सुसूत्र करण्यासाठी विविध कायद्यांच्या अंतर्गत आणि विविध परस्परविरोधी नियमांच्या अंतर्गत काम करणारे लवाद यामुळे बंद केले जातील. त्याऐवजी एकसूत्री, सुलभ लवाद व्यवस्था स्थापन करण्यात येईल, असे सीतारामन यांनी विधेयक मांडताना स्पष्ट केले. त्या विधेयक मांडत असताना विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत संसदेत केवळ 18 तास काम झाले आहे. प्रत्यक्षात ते 107 तास होणे आवश्यक होते. विरोधकांनी कामकाज बंद पाडायचे, असा चंग बांधल्याची टीका भाजपने केली.