न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले, सुनावणी सोमवारपर्यंत लांबणीवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गाजत असणाऱया कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी येत्या सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. सुनावणी लांबणीवर टाकण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुन्हा एकदा महत्वाचा इशारा दिला. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. याचिकांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेळ मागितल्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी 16 ऑगस्ट, अर्थात येत्या सोमवारी होईल, असे स्पष्ट करत वेळ दिला.
पेगॅसस प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही याचिकाकर्त्याने न्यायालयाबाहेर याची चर्चा करु नये. तसेच समांतर सुनावणीचा प्रकारही करु नये. न्यायालयावर याचिकाकर्त्यांनी विश्वास ठेवणे आवश्यक आहे. न्यायालय सर्वांचे एकूनच आपला निर्णय देणार आहे, अशी स्पष्टोक्ती करण्यात आली.
तातडीच्या नोटीसची मागणी नाकारली
केंद्र सरकारला औपचारिक नोटीस दिली जावी, अशी मागणी एका याचिकाकर्त्याच्या वकीलांनी केली. मात्र, केंद्र सरकारला नोटीस द्यायची की नाही, या संबंधीचा निर्णय आम्ही सोमवारच्या सुनावणीनंतरच घेऊ असे स्पष्ट करत न्यायालयाने औपचारिक नोटीस तत्काळ देण्याची मागणी फेटाळली. तसेच सर्व याचिकाकर्त्यांनी त्यांना खंडपीठाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातूनच द्यावीत, असाही आदेश देण्यात आला आहे.
10 याचिका सादर या प्रकरणात आतापर्यंत 10 याचिका केंद्र सरकार विरोधात सादर झाल्या आहेत. शेवटची याचिका यशवंत सिन्हा यांनी सादर केली आहे. 9 याचिकांच्या प्रती सरकारला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून या संबंधात चर्चा करुन बाजू मांडण्यात येईल, असे प्रतिपादन तुषार मेहता यांनी केले.