आतापर्यंत 29 मोबाईल्सचा तपास ः सर्वोच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान तांत्रिक चौकशी समितीचा अंतरिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात आतापर्यंत 29 मोबाईल तपासण्यात आल्याचे आणि अनेक लोकांशी बोलणे झाल्याचे सांगण्यात आले आहे. मे महिन्याच्या अखेरीस परिपूर्ण अहवाल तयार होईल, अशी माहिती समितीच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली. याचप्रसंगी न्यायालयाने वेळ वाढवून देतानाच समितीला प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने तपास समितीकडून पुढील चार आठवडय़ात अहवाल मागवला आहे.
पेगॅसस प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली. चार आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे निर्देश देत 28 जूनपर्यंत चौकशी समितीला मुदतवाढ देण्यात आली. या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. समितीने तपासासाठी एक सॉफ्टवेअरही बनवले आहे. ही समिती मे अखेरीसपर्यंत आपला तपास पूर्ण करेल आणि अंतिम अहवाल चार आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरणात मोबाईल हॅक झाल्याचा आरोप झाल्यावरून देशात आणि संसदेत बरेच वादळ उठले होते. या आरोपानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. अनेक दिग्गजांचे मोबाईल हॅक झाल्याचा दावा करण्यात आला तरी न्यायालयीन चौकशीपासून कित्येक जण दूर राहिले होते.