प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहराच्या पश्चिमेकडील रत्नदुर्ग किल्ल्यावर जाणाऱया रस्त्यात पेठकिल्ला येथे आंब्याचे झाड पडल्याने मार्गावर अडथळा येऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी हे झाड मार्गावरून हटवले.
सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली होती. पेठकिल्ला येथील मार्गावर आंब्याचे भलेमोठे झाड आडवे झाल्याने रस्ता बंद झाला होता. या वेळेत येथे कोणतीही वाहने नसल्याने अपघात टळला. हे झाड वीज वाहिन्यांवर कोसळल्याने तीन पोलही जमीनदोस्त झाले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. तातडीने तेथील ग्रामस्थांनी याची माहिती नगरसेवक बंटी कीर यांना कळवल्यावर त्यांनी तातडीने महावितरणच्या रहाटाघर सबस्टेशनला याची माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱयांनी तात्काळ धाव घेत येथील वीजपुरवठा बंद केला. हे झाड रस्त्यावरून बाजुला करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.