वार्ताहर/ माखजन
संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे गावाला सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असून त्यावर तात्पुरता उपाय काढत पंचायत समिती देवरुख गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी गावाला पहिलाच पाण्याचा टँकर पाठविला आहे. तर तालुक्यातून दुसरा पाण्याचा टँकर धावला आहे.
मागील अनेक दिवसांपासून टंचाईने रौद्ररुप धारण केले होते. ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत वरवटकर, ग्रामसेवक शिंदे, पोलिस पाटील व ग्रामस्थ यांनी टंचाई आराखडा तयार करुन पाण्याबाबतची मागणी केली होती. याबाबत तात्काळ निर्णय घेवून या गावाला शासनाकडून पहिलाच पाण्याचा टँकर मिळाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱयावर समाधान आहे.
या गावाची लोकसंख्या 1200 च्यावर आहे. मात्र धारणाकवाडी व कोंडाचीवाडीत 300 हून अधिक लोकसंख्या असून या वाडय़ा डोंगर कडय़ावर असल्याने येथील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. साधारणपणे दोन मैल अंतरावर येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कायमस्वरुपी या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने दरवर्षीच या ठिकाणी पाणीटंचाईची समस्या जाणवते.
गतवर्षी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या माध्यमातून ‘पिण्याचे पाणी’ मिळाले. यावर्षी पुन्हा हा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभराचा वेळ पाण्याची वाट बघण्यात व पाणी आणण्यात जात असल्याने शेतीबरोबर दैनंदिन कामे केव्हा करणार असा प्रश्न पडत आहे. जूनपर्यंत या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा तसेच कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा इतकीच अपेक्षा सध्या लोकांमधून समोर येत आहे.