पाच तालुक्यांतील ध्वनी चर्चासत्राद्वारे अधिकाऱयांनाही मार्गदर्शन
प्रतिनिधी/ कणकवली
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप भात पेरणीनंतर व्यवस्थापन व कोविड – 19 च्या अनुषंगाने शेती करताना घायची काळजी, याविषयी ध्वनी चर्चासत्राद्वारे उमेदच्या फिल्ड स्टाफ व शेतकऱयांना घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप भात लागवडीच्या अनुषंगाने कोरोना पार्श्वभूमीवर भात पेरणीनंतर शेतीचे नियोजन कसे करावे, यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस व रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ले तालुक्यातील उमेदचे अधिकारी व शेतकऱयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या ध्वनी चर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.
यात उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांनी ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उमेदच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उमेदच्या विविध उपक्रमांतून महिला शेतकऱयाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार ते 1 लाखापर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसचे कृषी विस्तार तज्ञ डॉ. विलास सावंत यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उमेदच्या अधिकाऱयांना सेंद्रिय भात लागवडीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भात लागवड, सेंद्रिय खत व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, भात वाणाची लागवड कालावधी व त्याची योग्य नियोजन व सेंद्रिय शेतीचे प्रामाणिकीकरण (certification) कसे करावे, याची सखोल माहिती दिली.
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शारीरिक अंतर (Physical Distancing) कसे राखावे, शेतातून काम करताना व काम करून आल्यावर वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, याचीही माहिती डॉ. विलास सावंत यांनी दिली.
रिलायन्स फाऊंडेशनचे कृषी तज्ञ सचिन मताले यांनी सेंद्रिय व रासायनिक पद्धतीने योग्य वापर करून भात लागवड कशी करावी, याची माहिती दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, गणपत गावडे यांनी केले. शेती, पशुपालनाविषयी तांत्रिक माहितीसाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या टोल फ्री हेल्पलाईन 18004198800 क्रमांकावर सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन रिलायन्स फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.