प्रतिनिधी / सेनापती कापशी
शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत असून जास्तीत जास्त मशागत ही यंत्राद्वारेच केली जाते. परिणामी बैलांची संख्या घटली आहे. मात्र काही अंशी मशागत, पेरण्या या बैलांच्याशिवाय करताच येत नाहीत. मग घाईच्या वेळी बैल जोड्या मिळत नसल्याने कुरीचे ‘जू’ तरुणांच्या खांद्यावर आले आहे. तरुणही आनंदाने हे जू हातावर, खांद्यावर घेवून ओढताना दिसत आहेत. ‘रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा’ उगीचच म्हणत नाहीत. खरच या नक्षत्रावर पेरणी केल्यास घरात धान्याच्या राशीच लागतात. म्हणून शेतकरी वर्षानुवर्षे पेरणी साधण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यंदा वळीव पाऊस चांगला झाल्याने रानांची मशागत चांगली होवून ग्रामीण भागातील भाताच्या धुळवाफ पेरण्या ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांना जोर असून चारच दिवसात भाता बरोबर सोयाबीन, भुईमूग व इतर पेरण्याही पूर्णत्वाकडे जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणासाठी व नोकरीच्या निमित्ताने बाहेर असणारी लोकं आता आपापल्या गावी आहेत. पेरणीच्या दिवसांत एकाचवेळी सर्वांची घाई असते. पण यंदा शेती करणाऱ्या बांधवांकडे मनुष्यबळ असल्याने जादा धावपळ करावी लागणार नाही. शेतावर मदतीसाठी आता हे लोक दिसत आहेत. नंद्याळ येथील पाटील कुटूंबाने ४० गुंठे भात पेरणी केली. एक इंजिनिअर व दुसरा बी.एस्सी शिक्षण घेत असलेला तरुण चक्क भात पेरणीवेळी बैलं न मिळाल्याने स्वतः कुरी ओढून पेरणीचा मुहूर्त साधण्यास मदत करीत आहेत. हे आज गावोगावी चित्र दिसत आहे.