पाण्याच्या नैसर्गिक वाटा बंद झाल्याचा परिणाम : नागरिकांनी मांडली कैफियत
प्रतिनिधी /काणकोण
मागच्या दोन दिवसांपासून काणकोण तालुक्यात पडलेल्या पावसामुळे गालजीबाग आणि तळपण नद्यांना पूर आलेला असून महालवाडा, पैंगीण येथील हाददुरिग रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतीत पाणी साचल्यामुळे महालवाडा-गालजीबाग रस्ता जलमय आणि धोकादायक असा बनलेला आहे.
महालवाडा येथील शेतकरी आणि जमीनमालकांनी पाण्याच्या वाटा बंद केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी शेतजमिनीत भराव टाकण्यात आल्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक वाटा बंद झाल्या आहेत, अशा कैफियती या भागातील रहिवासी प्रेमानंद च्यारी, दिलीप पर्वतकर, रूपेश काणकोणकर यांनी मांडल्या. 2009 साली ज्या वेळी या भागात महापूर आला होता त्या वेळी देखील पाणी साचून रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला होता आणि त्यात संदीप पैंगीणकर याला बुडून मृत्यू आला होता, याकडे यावेळी स्थानिकांनी लक्ष वेधले.
त्याच वेळी या भागातील नदीतील गाळ काढण्यात यावा तसेच पाण्याच्या नैसर्गिक वाटा खुल्या कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली होती. परंतु या मागणीकडे सरकारने किंवा स्थानिक पंचायतीने देखील लक्ष दिले नसल्याची कैफियत या नागरिकांनी मांडली. पुढील दोन दिवस अजून जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली असून अशीच परिस्थिती राहिल्यास नदीकाठच्या घरांत पाणी शिरण्याची शक्यता च्यारी यांनी व्यक्त केली. आपण आज वयाच्या 67 व्या वर्षांत असून अशा प्रकारची परिस्थिती आपण यापूर्वी कधी पाहिली नव्हती. ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हा रस्ता आपल्या जन्मापूर्वीचा असून केवळ पाण्याच्या वाटा बंद केल्यामुळे या रस्त्यावरून पाणी जात असल्याचा दावा काणकोणकर या युवकाने केला. तर पाण्याच्या नैसर्गिक वाटा बंद करण्याबरोबर शेती-बागायतींत मातीचे भराव टाकल्याचा हा परिणाम असल्याची माहिती पर्वतकर यांनी दिली. जलस्त्रोत खात्याने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली आहे. परंतु संरक्षक भिंतीची उंची जास्त झाली आहे आणि पाण्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला असलेले ओढे साफ करण्यात यावेत, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.